अकोल्यानंतर आता नाशिक तापले; दोन वर्षांनंतर तापमानाचा पारा 42 अंशांवर, रस्त्यावर शुकशुकाट... (संग्रहित फोटो)
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. नाशिक शहरासह निफाड तालुक्यात सोमवारी (दि.११) कमाल तापमानाने थेट ४६ अंशांचा टप्पा गाठल. नाशिक शहरात दोन वर्षानंतर पारा ४२ अंशांवर पोहोचून रेकॉर्ड ब्रेक नोंद झाली आहे. यापूर्वी शहरात २३ मे २०२४ रोजी ४२ अंश तापमान नोंदवले गेले होते.
यंदाच्या हंगामात २५ एप्रिल रोजी ४१.५ अंश तापमानाची उचांकी नोंद झाली होती. तो विक्रम अवघ्या १५ दिवसांत मोडीत निघाला आहे. गेल्या २४ तासात कमाल तापमानात १.४ अंशाची वाढ नोंदविली गेली आहे. पारा चाळिशीपार राहिल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी सकाळी ८.३० वाजल्यापासूनच उन्हाच्या असह्य झळा बसण्यास सुरुवात झाली. सूर्याची किरणे थेट अंगावर आल्याने उन्हाचे तीव्र चटके सहन सोसावे लागले. दुपारी १२ ते ४ या वेळेत रस्ते ओस पडल्याचे पाहायला मिळाले. मुख्य बाजारपेठामध्ये शुकशुकाट दिसून आला. अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडताना दिसले नाही.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील ४८ तास उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी दुपारी १२ ते ४ घराबाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे, डोक्यावर टोपी, रुमाल बांधावा, सुती व सैल कपडे वापरावेत, असे आवाहन जिल्हा आपत्ती विभागाने केले आहे.
यापूर्वीही ४२ अंशांची नोंद
यंदा तापमानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. शहरामध्ये यापूर्वी २५ एप्रिल २०१९ ला ४२. ८ इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर देखील २३ मे २०२४ला १४ अंश इतक्या उचांकी तापमानाची नोंद झालेली होती.
अनेकांना बसतोय उष्णतेचा फटका
स्पर्धा परीक्षांचे क्लास, शिकवण्यांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. तापमानाचा पारा सतत वाढत असल्याने एसी, कुलर, पंख्यांचा वापर कमालीचा वाढला आहे. परिणामी, वीजेची मागणी उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. शहरात अधूनमधून वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक उकडाक्याने त्रस्त झाले आहे.
निफाडच्या शिवडीत ४६ अंशांचा विक्रम
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, सोमवारी उष्णतेच्या लाटेने उच्चांकी पातळी गाठली आहे. तालुक्यातील शिवडी परिसरात तापमानाचा पारा चक्क ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने संपूर्ण परिसर अक्षरशः होरपळून निघाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. सकाळच्या नऊ वाजेपासूनच उन्हाच्या तीव्र झळा लागण्यास सुरुवात होत असल्याने कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.






