
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पालघरमध्ये पुराचे थैमान; वीजपुरवठा ठप्प, 2 लाख लोक अंधारात, तब्बल 900 नागरिकांचे स्थलांतर
सफाळे पश्चिम किनारपट्टी परिसरातील सुमारे १ हजार २१६ हेक्टर जमीन संपादित करून एस्सार पेट्रोलियम प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पासाठी दांडी, उसरणी, मधुकरनगर, भादवे, मथाणे व इतर गावांतील जमिनींचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी, मच्छीमार आणि भूमिपुत्रांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. जमिनींचे संपादन झाल्यास पारंपरिक व्यवसाय उद्ध्वस्त होतील, किनारपट्टीच्या पर्यावरणीय समतोलाला धोका निर्माण होईल आणि स्थानिकांच्या पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.
एडवण येथील शिवमंदिरात झालेल्या संयुक्त बैठकीला एडवण, कोरे, दातिवरे, मथाणे, भादवे, खटाळी आदी गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत प्रस्तावित एस्सार पेट्रोलियम प्रकल्पाबरोबरच संभाव्य विमानतळ प्रकल्पालाही एकमुखी विरोध नोंदवण्यात आला. कोणताही विकास प्रकल्प स्थानिकांची संमती, पारदर्शक प्रक्रिया आणि पर्यावरणीय निकषांचे पालन केल्याशिवाय राबवू नये, अशी ठाम भूमिका उपस्थितांनी मांडली.
एस्सार कॅपिटल अॅडव्हायझरी इंडिया लिमिटेडने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून जमीन संपादन प्रक्रिया सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला असून, १८ जून रोजी भूसंपादन विभागाकडे प्रस्तावित नकाशे व आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या उपजीविकेवर व पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने ठाम विरोध केला जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. त्यामुळे सफाळे किनारपट्टीवरील प्रस्तावित प्रकल्पांचा मुद्दा आता अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.