सातारा जिल्ह्यात मतदानासाठी मतदान यंत्रणा सज्ज (फोटो - सोशल मीडिया)
सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि ११ पंचायत समितीच्या १३० गणांसाठी शनिवारी (दि.७) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीमध्ये मतदान होत आहे. या मतदानासाठी जिल्ह्यात ११ हजार ८२२ मतदान यंत्र तैनात करण्यात आले आहेत. सातारचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील २१ लाख ९४ हजार ११० मतदार मतदान करणार आहेत. यासाठी 20 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील जावळी, पाटण, महाबळेश्वर, वाई ,कराड येथील काही अति दुर्गम व मागास भागातही मतदान यंत्रणा पोहोचवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये आठ वर्षानंतर होणाऱ्या सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांतर्गतच तसेच विरोधी पक्षातील उमेदवारांची कसोटी लागणार आहे. बऱ्याच अपेक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. स्थानिक जिरवा-जिरवीच्या राजकारणामुळे काही अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज ठेवून या निवडणुकीत आपलं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
सातारा जिल्ह्यात 11 लाख ८ हजार २०३ पुरुष व दहा लाख ८५ हजार ८४७ महिला आणि इतर ६० मतदार नोंदणी झालेली आहे. जिल्ह्यातील २८७७ मतदान केंद्रावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस व खाजगी वाहनाने मतदान यंत्रणा व कर्मचाऱ्यांना जाण्या-येण्यासाठी सोय केली आहे. तर दुसऱ्या बाजूला परगावातील मतदारांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांनी वाहनांचे नियोजन केले आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : राष्ट्रवादी विलिनीकरणावरुन रंगलं राजकारण! शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना धरलं धारेवर
खऱ्या अर्थाने राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीच्याबाबत शासकीय काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. प्रस्थापित उमेदवारांच्या प्रचारा निमित्त ग्रामीण भागात जेवणावळी सुरू आहे. अद्यापही एकाही ठिकाणी कारवाई झालेली नाही. निवडणुका म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्साह पूर्वी होता.
अनेक ठिकाणी विनापरवाना प्रचाराची वाहने
आता सत्ताधाऱ्यांच्या समवेतच काही प्रशासकीय पक्षनिष्ठा व व्यक्तीनिष्ठांचा उद्रेक झालेला आहे. अनेक ठिकाणी विनापरवाना प्रचाराची वाहने फिरत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या सोबतच अनधिकृत व्यावसायिक प्रचारामध्ये उतरले आहेत. लेखी तक्रारीची गंभीर दखल घेतली नसल्याचा अनुभव आहे. याची सुद्धा उघडपणे चर्चा ग्रामीण भागात होताना दिसत आहे आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: कोकणाबाबत एकनाथ शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले, “लक्ष्मी ऑरगॅनिकसारखे प्रदूषणकारी…”






