संग्रहित फोटो
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल ९ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला, तर ११ फेब्रुवारीला नवनिर्वाचित सदस्यांची अधिसूचना काढण्यात आली. मात्र, त्यानंतरही पदाधिकारी निवडीसाठी सर्वसाधारण सभेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. कायद्यानुसार पहिली सभा बोलावणे आणि पदाधिकारी निवडीची प्रक्रिया राबविणे हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असतात. त्यामुळे त्यांच्या घोषणेची प्रतीक्षा सुरू आहे.
दरम्यान, गेल्या तीन वर्षे दहा महिन्यांपासून प्रशासकीय राजवट लागू असल्याने कालावधी संपल्यानंतर तातडीने बैठक बोलावण्याची नेहमीची तरतूद येथे लागू होत नाही. परिणामी, स्वतंत्रपणे पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम निश्चित करावा लागणार आहे. सर्वप्रथम पंचायत समित्यांचे सभापती-उपसभापती निवडले जाणार असून त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड होईल.
निकाल लागून नऊ दिवस उलटल्याने नवनिर्वाचित सदस्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. काही सदस्यांनी कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेत फेऱ्याही सुरू केल्या आहेत. मात्र, अधिकृत नेतृत्व निश्चित होईपर्यंत निर्णयप्रक्रियेला वेग येणार नाही, अशी स्थिती आहे.
हे सुद्धा वाचा : मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर नसीम खान आक्रमक; सरकारवर केली जोरदार टीका
राज्यभर एकाच दिवशी निवडीचा विचार
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणी पदाधिकारी निवड एकाच दिवशी घेण्याचा विचार ग्रामीण विकास विभागाकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच पुणे विभागातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडी एकाच तारखेला व्हाव्यात, यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर हालचाली सुरू असल्याचे समजते. वेगवेगळ्या तारखा ठरवल्यास पुढील कालावधी आणि आरक्षण चक्र वेगवेगळ्या वेळी संपुष्टात येईल, त्यामुळे भविष्यातील निवडणुकांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर एकसमान तारीख निश्चित करण्यावर भर दिला जात आहे.
हे सुद्धा वाचा : शिवजयंतीच्या दिवशीच शिवनेरीवर मोठी चेंगराचेंगरी; अनेक शिवभक्त जखमी, मध्यरात्रीच…






