सौजन्य - नवराष्ट्र टीम
मंदिर बंद असल्याने प्रसाद विक्रेते, फुलविक्रेते, माळा विक्रेते, नारळ विक्रेते, चहा व नाश्ता दुकाने अशा अनेक छोट्या व्यवसायांवर मोठा आर्थिक फटका बसला आहे. विशेषतः महाशिवरात्रीच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होत असते आणि त्यावेळी प्रसाद, फुले व पूजेच्या साहित्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते. या काळावरच अनेक दुकानदारांचे वार्षिक उत्पन्न अवलंबून असते. मात्र मंदिर बंद असल्याने भाविकांचा ओघ थांबला असून, दुकाने उघडी ठेवूनही ग्राहक मिळत नसल्याने अनेकांनी तात्पुरती दुकाने बंद केली आहेत. रोजंदारीवर चालणाऱ्या या व्यवसायांवर परिणाम झाल्याने दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विकासकामे पूर्ण झाल्यानंतर भाविकांची संख्या वाढेल आणि व्यवसाय पुन्हा सुरू होतील, अशी अपेक्षा दुकानदार व्यक्त करत असले तरी सध्याच्या काळात त्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
मंदिर बंद असल्याने आमचा फुले विक्रीचा संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला आहे. महाशिवरात्रीचा हंगाम आमच्यासाठी महत्त्वाचा असतो. तीन महिने दुकान बंद ठेवावे लागल्याने घरखर्च करणे कठीण झाले आहे. -शंकर शेडगे, फुलवाले श्री क्षेत्र भीमाशंकर.
मंदिर खुले ठेवणे सुरक्षिततेच्या दृष्टीने शक्य नाही
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसरात विकास कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. दगडी बांधकाम सुरू असल्याने तसेच दगड व बांधकाम साहित्य हलविणे शक्य नसल्यामुळे, महाशिवरात्री कालावधीत गुरुवारी ( दि.१२) ते बुधवारी (दि.१८) मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे सुरक्षिततेच्या दृष्टीने शक्य नसल्याचे संस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी सांगितले. श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कामे सध्या प्रगतिपथावर असून, कुंभमेळ्यापूर्वी सर्व आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बांधकाम सुरू असताना मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे भाविकांची सुरक्षितता अबाधित राखणे तसेच विकास आराखड्यातील कामे नियोजित कालमर्यादेत पूर्ण करणे या उद्देशाने यापूर्वी मंदिर तीन महिन्यांसाठी (महाशिवरात्रीचा कालावधी वगळून) तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. पूर्वी भाविकांच्या सोयीचा विचार करून महाशिवरात्री कालावधी (दि.१२ ते १८ फेब्रुवारी) वगळण्यात आला होता. तथापि, सध्या सुरू असलेल्या बांधकामाच्या कामाचा वेग, व्याप्ती व सुरक्षेच्या बाबींचा सखोल आढावा घेतल्यानंतर, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात दगडी बांधकाम सुरू असल्याने तसेच दगड व बांधकाम साहित्य हलविणे शक्य नसल्यामुळे, महाशिवरात्री कालावधीत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे सुरक्षिततेच्या दृष्टीने शक्य नसल्याचे निदर्शनास आले आहे. भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी सदर निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
श्री क्षेत्र भीमाशंकर हा अतिवृष्टीचा प्रदेश असून, जून ते सप्टेंबर या कालावधीत येथे अत्यंत जास्त पावसाचे प्रमाण असते. या कालावधीत बांधकाम कामे करणे शक्य नसल्याने उपलब्ध कालावधीतच कामे पूर्ण करणे आवश्यक आहे.यामुळे विकास कामांना गती देणे अत्यंत गरजेचे आहे. – रमेश येवले, उद्योजक गंगापूर






