संग्रहित फोटो
यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने २६ जागांवर उमेदवार उभे केले होते; मात्र सर्व ठिकाणी पराभव पत्करावा लागला. जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून १९९९ पर्यंत तब्बल ३८ वर्षे काँग्रेसचे वर्चस्व होते. २०१७ च्या निवडणुकीतही पक्षाला ७ जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदा शून्यावर घसरल्याने पक्षात आत्मचिंतनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पराभवानंतर संघटना बळकट करण्यासाठी जिल्हा काँग्रेसने मोहीम हाती घेतली आहे. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दौंड, इंदापूर, बारामती आणि पुरंदर तालुक्यांत संघटनात्मक दौरे सुरू झाले आहेत. या दौऱ्यांदरम्यान तालुका काँग्रेस कमिटींच्या आढावा बैठका घेऊन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला जात आहे. सदस्य नोंदणी, आगामी निवडणुकांची रणनीती आणि स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून पुढील नियोजन आखले जात आहे.
‘काँग्रेस आपल्या दारी’ या संकल्पनेतून जिल्हा नेतृत्व थेट तालुकास्तरावर पोहोचत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. “संघटना मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांना बळ देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. येत्या काळात काँग्रेस अधिक सक्षम करून तळागाळापर्यंत पोहोचवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे सुद्धा वाचा : उजनी पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्तांना दिलासा मिळणार? सकारात्मक निर्णयाचे संकेत
सासवडमध्ये आंदोलन
दरम्यान, केंद्र सरकारच्या कथित शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ पुरंदर तालुका काँग्रेसच्या वतीने सासवड येथील शिवतीर्थावर आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रदेश काँग्रेसचे महासचिव देविदास भन्साळी, दत्ता झुरंगे, राजेंद्र बरकडे, आकाश मोरे आदी पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.
काँग्रेसचा मोठा निर्णय
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने चिपळूणमध्ये तीन दिवसीय निवासी शिबिर आयोजित केले आहे. उद्या शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारीला या शिबिराची सुरुवात होणार असून १ मार्चला शिबिराची सांगता होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागातील सर्व उमेदवारांसाठी हे निवासी प्रशिक्षण शिबिर आहे.






