राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल (Photo Credit- X)
राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, कोणताही मुद्दा असो, जर कोणी संविधानाच्या चौकटीत राहून सत्ताधाऱ्यांविरुद्ध आवाज उठवला, तर त्याला लाठीमार, खोटे खटले आणि तुरुंगवासाला सामोरे जावे लागत आहे. त्यांनी विविध उदाहरणे देऊन सरकारची कोंडी केली.
आज भारत में Compromised PM के राज में शांतिपूर्ण विरोध करना ही सबसे बड़ा “अपराध” बना दिया गया है। दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र को धीरे-धीरे ऐसी दिशा में धकेला जा रहा है, जहां असहमति को देशद्रोह और सवाल पूछने को साज़िश बताया जाता है। सोचिए – मुद्दा कोई भी हो, अगर आप सत्ता के… — Rahul Gandhi (@RahulGandhi) February 26, 2026
ते म्हणाले की, “पेपर लीक प्रकरणाने त्रस्त झालेल्या तरुणांनी जेव्हा आपल्या भविष्यासाठी आवाज उठवला, तेव्हा त्यांना लाठ्यांनी मारहाण करण्यात आली. देशाचा गौरव असलेल्या महिला कुस्तीपटूंनी भाजपच्या बड्या नेत्यावरील आरोपांची निष्पक्ष चौकशी मागितली, तेव्हा त्यांचे आंदोलन चिरडण्यात आले. तसेच, बलात्कार पीडितेच्या समर्थनात इंडिया गेटवर झालेल्या शांततापूर्ण निदर्शनांना प्रशासनाने ‘असुविधा’ मानून दडपले.” अमेरिकेसोबतच्या व्यापारी कराराचा (US Trade Deal) विरोध करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ‘देशविरोधी’ ठरवून अटक केल्याचा मुद्दाही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पर्यावरणाच्या प्रश्नावर बोलताना राहुल गांधींनी लिहिले की, “जेव्हा सामान्य लोक विषारी हवेच्या विरोधात रस्त्यावर उतरले, तेव्हा त्यांच्या चिंतेची ‘राजकारण’ म्हणून हेटाळणी करण्यात आली. शेतकऱ्यांनी आपल्या हक्कांच्या मागण्या केल्या, तेव्हा त्यांना देशविरोधी ठरवले गेले. अश्रूधुराचे नळकांडे, रबरच्या गोळ्या, पाण्याचे फवारे आणि लाठीमार हेच आता संवादाचे माध्यम बनले आहे.” जल-जंगल-जमिनीच्या हक्कासाठी लढणाऱ्या आदिवासी समुदायालाही संशयाच्या नजरेने पाहिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
लोकशाहीच्या व्याख्येवर भर देताना राहुल गांधींनी सरकारला खडेबोल सुनावले. ते म्हणाले, “ज्या लोकशाहीत पंतप्रधान प्रश्नांना घाबरतात आणि असहमती चिरडणे हा शासनाचा स्वभाव बनतो, ती लोकशाही संकटात आहे. प्रश्न विचारणे ही लोकशाहीची कमजोरी नसून ताकद असते. सरकार जेव्हा टीका ऐकते आणि उत्तरदायी राहते, तेव्हाच लोकशाही मजबूत होते.” आपल्या पोस्टच्या शेवटी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट इशारा देताना म्हटले की, “मोदीजी, हे उत्तर कोरिया नाही, भारत आहे. जेव्हा सत्ता स्वतःलाच ‘राष्ट्र’ समजू लागते आणि विरोधाला ‘शत्रू’ मानते, तेव्हा लोकशाहीचा अंत होतो.”






