संग्रहित फोटो
पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी आत्तापर्यंत ७ गावांतील शेतकऱ्यांकडून ९२० एकर जमिनीसाठी संमतीचे करारनामे झाले आहेत. एकूण हव्या असलेल्या ३ हजार ४० एकर जमिनीच्या तुलनेत हे प्रमाण ३०.२६ टक्के इतके आहे. दरम्यान, जमिनीच्या मोबदल्यापोटी गेल्या तीन दिवसांमध्ये मुळ शेतकऱ्यांना एकूण ११५ कोटी रुपयांच्या रकमेचे वाटप केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
डुडी म्हणाले, पुरंदर येथील जमिनीच्या मोबदल्यात रक्कम देताना प्राधान्य मुळ शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. त्यांना प्रथम ही मोबदला रक्कम दिली जात आहे. त्यानंतर गुंतवणूकदारांचा विचार केला जाणार आहे. शेतकऱ्यांसोबत करारनामा केला की त्याचवेळी त्यांच्या बँक खात्यामध्ये आरटीजीएसद्वारे मोबदला रक्कम जमा केली जात आहे. शेतकऱ्यांना मोबदला रक्कम देण्यापुर्वी नोटीस बजावली जात आहे. सर्व बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नोटीस काढण्यात आली आहे. त्यातील काही शेतकऱ्यांना नोटीसा मिळाल्या आहेत. तर, काही शेतकऱ्यांना एक ते दोन दिवसांमध्ये मिळतील.
शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नोटीसमध्ये जमिनीचा एकूण मोबदला तसेच, जमिनीव्यतिरिक्त विहिरी, बोअरवेल, घरे, शेड, झाडे आदी निगडीत घटकांचे स्वतंत्र मूल्यांकन करून त्यांची संख्या आणि मोबदला रक्कम नोटीसमध्ये नमूद केली जात आहे. यामध्ये पूर्ण पारदर्शकता ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतजमिनीव्यतिरिक्त विहिरी, बोअरवेल, घरे, शेड, झाडे यापैकी कशाचेही मुल्यांकन बाकी असल्याचे आढळल्यास ती बाब शेतकऱ्यांनी निदर्शनास आणुन द्यावी. त्यानुसार कार्यवाही केली जाईल.
जमिनीवरील बोझा हटविण्यासाठी सुलभता
पुरंदर विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या शेतजमिनीवर कर्जाचा बोझा असल्यास तो हटविण्यासाठी सुलभ कार्यवाही केली जाणार आहे. शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून मोबदला रक्कम दिल्यानंतर त्यांनी बँकांना जमिनीवरील कर्जाचा बोझा हटविण्यासाठी धनादेश द्यावा. त्यानंतर बँकांकडून देखील शेतकऱ्यांना ना हरकत प्रमाणपत्र मिळेल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर कर्जाचा बोझा आहे त्यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. त्यातून तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
पुरंदर विमानतळ प्रकल्प रद्द झाला की शेतकऱ्यांना दिलेली मोबदला रक्कम २५ टक्के व्याजासह परत घेतली जाईल, अशी चुकीची अफवा पसरविली जात आहे. त्याशिवाय, आत्ता जमिनीचा संमती करारनामा करू नका. नंतर मोबदला रक्कम वाढेल, असेही सांगितले जात आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येईल. शेतकऱ्यांनी अधिकृत माहिती भूसंपादन अधिकाऱ्यांकडून घ्यावी, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी.
हे सुद्धा वाचा : ‘व्हीआयपीं’च्या पुणे दौऱ्याचा ताफा आता निम्म्यावर! पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय






