विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जयंत पाटलांचा पाठिंबा
Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटी आणि परीक्षेतील कथित गैरप्रकारांच्या मुद्द्यावरून पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश चांगलाच उफाळून आला आहे. शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून MPSC विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वतीने विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबाही मिळू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
जयंत पाटील यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपली भूमिका मांडली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारी पेपरफुटी किंवा परीक्षेतील गैरप्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेता कामा नयेत, असं त्यांनी म्हटलं.
आपल्या ‘X ‘ अकाऊंटवरून पोस्ट करत जयंत पाटील म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारी MPSC पेपरफुटी आणि परीक्षेतील गैरप्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाऊ नयेत. MPSC विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वतीने आज विराट आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आवाज बुलंद करण्यात आला आहे. हा महाराष्ट्रातील लाखो मेहनती, प्रामाणिक आणि स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे.”
Rahul Gandhi News: विद्यार्थी भाजपवर नाराज; महाराष्ट्रातील परीक्षा आंदोलनावर राहुल गांधींचा इशारा
ते पुढे म्हणाले, “आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करत दिवस-रात्र अभ्यास करून गरीब विद्यार्थी परीक्षा देतात. अशा परिस्थितीत पेपरफुटी, गैरप्रकार किंवा परीक्षेतील कोणतीही अनियमितता घडल्यास त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाते. मेहनत करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे. परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांना कठोरपणे आळा घालून पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी आहे.”
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारी MPSC पेपरफुटी आणि परीक्षेतील गैरप्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाऊ नयेत. MPSC विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वतीने आज विराट आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आवाज बुलंद करण्यात आला आहे. हा महाराष्ट्रातील लाखो… pic.twitter.com/bs3ornO5qn — Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 7, 2026
“विद्यार्थ्यांच्या मनातील असंतोष समजून घेऊन त्यांच्या मागण्यांवर तातडीने आणि सकारात्मक निर्णय घ्या. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यात आल्या पाहिजेत. MPSC विद्यार्थ्यांच्या या न्याय्य आणि हक्काच्या लढ्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही!” असे ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही या आंदोलनात सहभागी होत सरकार आणि MPSC प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. सरकार आणि आयोगाचा निषेध करण्यासाठी आपण काळा शर्ट घातल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी ते चक्क गाडीवर चढले आणि उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केलं.
“पैसे खाण्याच्या नादात गरीब मुलांचं नुकसान होत आहे,” असा आरोप करत रोहित पवार यांनी MPSC चे अध्यक्ष आणि सचिव बदलण्याची मागणी केली. आयोगावर स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी असायला हवेत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
रोहित पवार यांनी आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरही भाष्य केलं. हा विद्यार्थ्यांनी स्वतःहून काढलेला मोर्चा आहे, ही आणलेली गर्दी नाही, असा दावा त्यांनी केला. दिवसाचे अनेक तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना भ्रष्टाचार आणि गैरप्रकार मान्य नसल्याचं त्यांनी सांगितलं.
परीक्षेतील पारदर्शकता, निष्पक्षता आणि विश्वासार्हता टिकवणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं जयंत पाटील यांनीही म्हटलं आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यासोबतच भविष्यात पेपरफुटीसारख्या घटना होणार नाहीत, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे पुण्यातील वातावरण तापलं असून आता सरकार या मागण्यांवर काय निर्णय घेतं, याकडे विद्यार्थ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.






