सौजन्य - सोशल मिडीया
बारामती : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भूमिकेमुळे बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसकडून ॲड आकाश विजयराव मोरे यांचा दाखल केलेला अर्ज अखेर मागे घेण्यात आला. मात्र २३ उमेदवारी अर्ज कायम राहिले आहेत, त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह २३ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडेही बारामती पोटवडणूकीसाठी रिंगणात आहेत. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये दाखल केलेला माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी मुंबईतून वकील पाठवून या उमेदवारी अर्जातील त्रुटी काढण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करुणा मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी मी त्यांची बायको आहे, मात्र मला माझा हक्क देण्यासाठी त्यांची बायको नाही, असे करुणा मुंडे म्हणाल्या. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये करुणा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने मुंडे या बारामती प्रशासकीय भवनमध्ये आल्या होत्या. मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याबाबत ठाम भूमिका घेतली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, दिवंगत नेते अजितदादांच्या संशयित अपघात प्रकरणी त्यांना न्याय मिळाला पाहिजे, या भूमिकेतून आपण ही निवडणूक लढवत आहोत. अजितदादांच्या अपघाताची फिर्याद दाखल करून घेतली जात नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. अजित दादांसारख्या नेत्याला न्याय मिळत नसेल तर माझ्यासारख्या सामान्यांना न्याय कसा मिळेल, त्यामुळे अजित दादांना न्याय मिळण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत आहोत. मात्र माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी मुंबईवरून वकील पाठवला. सदर वकिलाने माझ्या उमेदवारी अर्जामध्ये मी धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याने, मुंडे यांच्या संपत्तीचा उल्लेख केला नसल्याची त्रुटी काढली. वास्तविक पाहता माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी मी त्यांची पत्नी आहे, मात्र मला माझा हक्क अधिकार मिळेल म्हणून, मी त्यांची पत्नी नाही, मुंडे यांची ५००० कोटी पेक्षा अधिक मालमत्ता आहे. बारामती मध्ये अनेक भागात पाण्याचा प्रश्न आहे. अजितदादांची बारामती असूनही त्यांना या ठिकाणी न्याय मिळत नाही हे दुर्दैव असल्याचे सांगत ही निवडणूक आपण विविध प्रश्न घेऊन लढवत असल्याचे त्यांनी सांगितले.






