साड्या वाटून आणि लोकांना देवदर्शन करून तालुक्याचा विकास करणार का?
सासवड : पुरंदर तालुक्यात रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली आहे, लोकांना रस्त्यावरून वाहने चालवता येईनात. त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळणे गरजेचे आहे, त्याबाबत कोणी बोलत नाही. मात्र, निवडणुका आल्या की, महिलांना साड्या वाटप करणे, लोकांना देवदर्शन घडवून आणून मतांचे प्रलोभन दाखवले जात आहे. त्यामुळे एकीकडे विकासकामांकडे दुर्लक्ष करायचे आणि निवडणुकीच्या काळात साड्या वाटून तालुक्याचा विकास करणार का? असा जाहीर सवाल गराडे गणातील भाजपच्या उमेदवार ललिता दिलीप कटके यांनी विरोधकांना केला आहे.
ललिता कटके यांनी जिल्हा परिषदेच्या उमेदवार दिव्या जगदाळे यांच्यासह दिवे गराडे गटातील विविध गावातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मतदारांनी त्यांच्याकडे वर्षानुवर्षे कोणतीच कामे झाली नसल्याची खंत व्यक्त करून अनेक समस्या मांडल्या आहेत. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तुम्हाला महिलांना साड्या वाटायच्या असतील तर दिवाळीत भाऊबीजेला का वाटत नाही ? असाही उपरोधिक टोला हाणला आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Budget 2026 : झालं क्लिअर ! देवेंद्र फडणवीस मांडणार राज्याचा अर्थसंकल्प
वाड्या वस्त्यांवर गाडी सुद्धा जाऊ शकत नाहीत, कचऱ्याची मोठी समस्या आहे, विद्युत व्यवस्था अद्यापही अनेक ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्यास यापूर्वीच्या लोकांना अपयश आले आहे. आमच्याच गावातील उमेदवार म्हणून निवडून दिले. मात्र, त्यांनी दशक्रिया विधी आणि लग्नसोहळा व्यतिरिक्त कोठेही दिसून आले नाहीत, अशा शब्दांत कोणाचेही नाव न घेता जोरदार टोला लगावला.
तरुणांनी शिक्षण घेतले मात्र रोजगाराची सुविधा नाही, त्यांना रोजगार मिळण्यासाठी या परिसरात विविध कंपन्या आल्यास अनेक तरुणांचा रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आपल्या भागात कंपन्या येण्या साठी प्रयत्न करणार असल्याचे ललिता कटके यांनी सांगितले आहे.
बचत गटातील महिला तसेच कित्येक सामान्य महिलांना अजूनही पुरेसे रेशनचे धान्य मिळत नाही, एखाद्या महिन्यात न्यायला उशीर झाल्यास धान्य संपल्याचे सांगितले जाते, मग नागरिकांचे धान्य कोठे जाते? असा प्रश्न उपस्थित करून महिलांना त्यांच्या हक्काचे धान्य नियमित मिळावे आणि त्यांना न्याय देण्यासाठी लढा देणार आहे असे ठणकावून सांगितले.
दरम्यान, ललिता कटके यांनी गराडे गणातील हिवरे, चांबळी, बोपगाव, भिवरी, गराडे आदी गावातील शेतकरी तसेच महिलांशी थेट शेतात जावून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी महिलांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. सध्या शेतात गुलाबाच्या फुलांची तोडणी, कांदे काढणी अशी शेतातील कामे सुरु असून, मतदारांना थेट शेतात जावून त्यांच्या भेटीगाठीचा सिलसिला सुरु केला आहे. अशा वेळी गावागावातील महिलांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे.
आमच्या भावना जाणून घेणाऱ्या उमेदवार आहेत, अशा शब्दात कौतुक केले जात असल्याचे दिसून येत आहे. आमच्या घरात कोणताही राजकीय वारसा नाही. मात्र, सामान्य लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे, आणि त्यांना योग्य न्याय देण्यासाठी निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात येत असल्याचे कटके यांनी सांगितले.






