संग्रहित फोटो
गेल्या काही आठवड्यांपासून जुन्नरच्या कानाकोपऱ्यात निवडणुकीचे वारे वाहत होते. प्रचारादरम्यान प्रत्येक उमेदवाराने ‘बिबट्यामुक्त जुन्नर’ आणि ‘शेतीसाठी दिवसा वीज’ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मतदानाची प्रक्रिया पार पडताच बिबट्याने पुन्हा एकदा आपली दहशत सिद्ध केली आहे. विशेषतः ओतूर, ओझर, डिंगोरे, पिंपरी पेंढार, पिंपळवंडी आणि राजुरी, बेल्हे, नारायणगाव, यासह आदी पट्ट्यात बिबट्याच्या हालचाली वाढल्या असून शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाणे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे.
नवनिर्वाचित सदस्यांची पहिली ‘अग्निपरीक्षा’
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर निवडून आलेल्या नव्या कारभाऱ्यांसाठी बिबट्याचा प्रश्न ही पहिली आणि सर्वात मोठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. अनेक गावांतून तात्काळ पिंजरे लावण्याची मागणी होत आहे. केवळ पिंजरे लावून प्रश्न सुटणार नाही, तर बिबट्यांचे नसबंदीकरण किंवा त्यांचे स्थलांतर यावर ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. वस्त्यांवरील सुरक्षिततेसाठी नवीन निधीची तरतूद कशी केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वनविभागाचे कर्मचारी सक्रिय
निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेले वनविभागाचे कर्मचारी आता पुन्हा एकदा फिल्डवर सक्रिय झाले आहेत. मात्र, बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे वनविभागाची यंत्रणा अपुरी पडताना दिसत आहे. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य पहिल्याच सभेत या विषयावर काय भूमिका घेणार यावर जुन्नरच्या ग्रामीण भागातील जनतेचे भवितव्य अवलंबून आहे.
निवडणुका येतात आणि जातात, पण बिबट्याचं संकट आमच्या पाचवीलाच पुजलेलं आहे. नवीन नेत्यांनी आता एसी गाडीतून उतरून आमच्या बांधावर येऊन परिस्थिती पहावी. — एक त्रस्त शेतकरी, जुन्नर तालुका.






