बदलत्या युद्धपद्धतीत तंत्रज्ञानाची भूमिका निर्णायक : लेफ्टनंट जनरल धीरज सेठ
पुणे : आधुनिक तंत्रज्ञान, माहितीवरील नियंत्रण आणि बहुआयामी युद्धपद्धतीमुळे भविष्यातील युद्धाचे स्वरूप झपाट्याने बदलत असून, नव्या पिढीतील लष्करी अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञानाबाबत सजग, बौद्धिकदृष्ट्या सक्षम आणि प्रत्यक्ष मोहिमांसाठी सदैव तयार राहणे आवश्यक असल्याचे मत लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी व्यक्त केले.
बिहारमधील गया येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (ओटीए) येथे आयोजित हिवाळी सत्रातील पासिंग आउट परेडच्या प्रसंगी ते बोलत होते. या समारंभात २८१ छात्रांनी कठोर प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय लष्करात अधिकारी म्हणून प्रवेश केला. यात ‘एसएससी (टेक) मेन-६४’चे २५३ छात्र आणि ‘एसएससी (टेक) विमेन-३५’च्या २८ महिला छात्रांचा समावेश होता.
परेडचे परीक्षण केल्यानंतर लेफ्टनंट जनरल सेठ यांनी नव्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या चिकाटी, समर्पण आणि कठोर परिश्रमाचे कौतुक केले. या यशामागे कुटुंबीयांचा पाठिंबा आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शनही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, आधुनिक युद्धाच्या स्वरूपात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सायबर तंत्रज्ञान, अवकाश क्षेत्र आणि विद्युत्चुंबकीय स्पेक्ट्रम यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत आहे. माहितीवरील प्रभुत्व आणि बहुआयामी रणनितीमुळे भविष्यातील युद्ध अधिक गतिमान आणि अनिश्चित बनत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारतीय लष्कराने वेगवान आणि अचूक प्रतिसाद देत विविध क्षमतांचे प्रभावी एकत्रीकरण करून आपली रणनैतिक ताकद दाखवून दिली, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, गया ही संस्था भारतीय लष्करासाठी तंत्रज्ञानाची जाण असलेले, शिस्तबद्ध आणि राष्ट्रसेवेची भावना जपणारे अधिकारी घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.
सध्या जागतिक आणि प्रादेशिक सुरक्षेचे वातावरण अधिक गुंतागुंतीचे बनत असताना सशस्त्र दलांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरत असल्याचे लेफ्टनंट जनरल सेठ यांनी सांगितले. ‘विकसित भारत २०४७’च्या उद्दिष्टाकडे देश वाटचाल करत असताना राष्ट्रीय सुरक्षेचे भक्कम आधारस्तंभ म्हणून सशस्त्र दलांचे योगदान निर्णायक राहील, असे त्यांनी नमूद केले.
गणवेशातील नेतृत्वासाठी शौर्याबरोबरच नैतिक धैर्य, आत्मविश्वास, संवेदनशीलता, ठामपणा आणि नम्रता हे गुण आवश्यक असल्याचे सांगत “देशाची सुरक्षा, सन्मान आणि कल्याण हे नेहमीच सर्वोच्च असले पाहिजे,” हा लष्करी नेतृत्वाचा मूलमंत्र नव्या अधिकाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.






