संग्रहित फोटो
देहूगांव/बद्रीनारायण घुगे : सोन्याच्या दराने नव्या उच्चांकाला गवसणी घातली आहे. यामुळे ऐन लग्नसराईत वधूपित्यांची चिंता वाढली आहे. पूर्वी विवाहात ११ ते २१ तोळे सोने वधूच्या अंगावर घालण्याची प्रतिष्ठेची परंपरा होती. मात्र, आता सोन्याच्या दरवाढीमुळे ही परंपरा अक्षरशः मोडीत निघाली आहे. आता वधूसाठी फक्त एक-दोन तोळे सोन्याचे दागिने घातले जात आहेत. सोन्याच्या दरवाढीमुळे यापुढे अव्वाच्यासव्वा सोने वधूला घालण्याची परंपरा आणखी कमी व्हावी, असाच सूर वधूच्या पालकांमधून व्यक्त होत आहे.
वर्षानुवर्षे बचत करून ठेवलेले पैसे मुलीच्या लग्नासाठी पुरेसे ठरत. आता सोन्याची बेसुमार दरवाढ झाल्याने तोळाभर सोन्याची खरेदीही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. सध्या सोन्याचा दर दीड लाखांवर गेला आहे. परिणामी, विवाहसोहळ्यांतील देवाणघेवाणीच्या पारंपरिक पद्धतीतही बदल झाला आहे. पूर्वी विवाह जमवताना ११, १५ किंवा २१ तोळे सोने वधूच्या अंगावर घालण्याची चर्चा लग्नाच्या बोलणीप्रसंगी होत असे. आता मात्र तोळाभर सोने तरी कसे जमवावे, असा गहन प्रश्न वधुपित्यासमोर आहे.
सोन्याचे दर गगनाला भिडल्याने लग्नसराईच्या हंगामात वधूपित्यांची अक्षरशः दमछाक होत आहे. टेपल, अॅटींग, बंगाली हार यासारखे कमी वजनाचे दागिने लगात देण्याचा कल वाढला आहे. हे दागिने कमी वजनात तयार होतात. त्यामुळे या दागिने खरेदीकडे अधिक कल आहे. वधूपित्याकडून हल्ली एक-दोन तोळ्यांपेक्षा जादा सोने खरेदी होत नाही. – व्हि. के. माळी, ज्वेलर्स व्यापारी, देहूगांव.
नवी अनुकरणनीय प्रथा
विवाह सोहळ्यात बांगड्या, पाटल्या, गोट, तोडे, बाजूबंद, छोटे मंगळसूत्र, नेकलेस, लक्ष्मीहार, मोठे मंगळसूत्र, कमरपट्टा, कानातील फुले-झुबे-वेल, नथसारखे दागिने वधूपित्याकडून कन्यादानात आंदण म्हणून दिले जात. आता सोने प्रति ग्रॅम दीड लाखापेक्षा जादा झाल्याने सोने खरेदी करताना वधूपित्यांचे कंबरडे मोडते. त्यामुळे आता एक-दोन तोळेच सोने नवरीच्या अंगावर घालण्याची नवी अनुकरणनीय प्रथा सुरू झाली आहे.
सोन्याच्या दरवाढीमुळे हल्ली अनेक ठिकाणी वधू पक्षाकडून वर पक्षाला लग्नाचा खर्च आम्ही करतो, पण सोने तुम्ही घ्या, अशा पद्धतीची बोलणी होत आहे. काही ठिकाणीतर मुलीसाठी आम्ही एक, दोन तोळे सोने देऊ उर्वरित खर्च वर पक्षाने उचलावा, अशी भूमिका वधूपिता घेत आहेत. यामुळे वधूसाठी लग्नात २१ तोळ्यावरून थेट एक-दोन तोळ्यांवर दागिन्यांची सद्दी आल्याचे दिसत आहे. एकंदरीत, सोन्याच्या दरवाढीने लग्नसराईची चमक कमी केली असून, वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरांना धक्का बसल्याचे दिसून येत आहे. – माणीक गाडे, माजी सरपंच शेतकरी सुदुंबरे






