डॅमने घेतला तरुणाचा जीव! पोहोयला उतरलेला आर्यन परतलाच नाही; कर्जत तालुक्यातील हृदयद्रावक घटना
मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन थापर हा भारतीय विद्यापीठात बीबीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. कॉलेजच्या सोशल प्रोजेक्टनिमित्त तो सुमारे 70 ते 75 विद्यार्थ्यांसोबत पळसदरी येथे आला होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर आर्यन आपल्या मित्रांसह डॅम परिसरात गेला. आर्यनला पोहता येत असल्याने तो पाण्यात उतरला. दोन वेळा पोहत जाऊन तो सुरक्षित परतही आला. मात्र, तिसऱ्यांदा पाण्यात उतरल्यानंतर तो अचानक खोल पाण्यात गडप झाला. मित्रांनी तत्काळ आरडाओरड करत मदतीसाठी धावपळ केली, मात्र त्याला वाचवण्यात अपयश आले.
पुण्यात तापमानाचा पारा पुन्हा चढला; सकाळी दहानंतरच बसतोय उन्हाचा चटका
घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच खोपोली येथील हेल्प फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते, मात्र अंधारामुळे मोहीम थांबवावी लागली. आज सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली असता रेस्क्यू टीमला यश आले आणि आर्यनचा मृतदेह डॅममधून बाहेर काढण्यात आला.
अनोळखी ठिकाणी पाण्याची खोली व परिस्थितीची माहिती नसताना पोहण्यासाठी उतरणे जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, पोलीस पाटील विनया खोपकर, डेला एडवेंचर चे गणेश गीध आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कर्जत पोलिसांनी खोपोली येथील हेल्प फॉउंडेशनच्या माध्यमातून बचाव आणि शोधकार्य राबवले. मात्र काल संध्याकाळी उशीरापर्यंत आर्यनचा मृतदेह सापडला नव्हता. अखेर आज त्याचा मृतदेह शोधण्यात बचाव टीम ना यश आले आहे. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत असून उन्हाळी पर्यटनासाठी धरण आणि नद्यांवर जात असताना सावधगीरी बाळगण्याचे अवाहन या निमित्ताने रायगड प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पळसदरी धरण रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात, कर्जत-खोपोली राज्य महामार्ग आहे. हे एक निसर्गरम्य ठिकाण असून, विशेषतः पावसाळ्यात धबधबे आणि हिरवाईमुळे पर्यटकांचे आकर्षण असते. या धरणाची निर्मिती १९१२ मध्ये रेल्वे प्रशासनामार्फत करण्यात आली होती. त्याकाळी वाफेच्या इंजिनाला पाणी पुरवण्यासाठी याचा वापर केला जात असे. तसेच मुंबई, पनवेल आणि नवी मुंबईतील नागरिक पावसाळी सुट्टीसाठी (Monsoon Picnic) येथे मोठ्या संख्येने येतात. पळसदरी डॅम परिसरात अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत, विशेषतः पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या बातम्या येत असतात. धरणात पाणी खोल असून गाळ असल्याने पोहण्यासाठी उतरणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.






