नेरळ पाडा मिनीट्रेन मार्गावरील फाटक-रस्ता बंद; वाहनचालकांचा संताप
कर्जत : नेरळ गावातून जाणाऱ्या नेरळ माथेरान मिनी ट्रेन मार्गावरील नेरळ पाडा येथील फाटक गेली चार दिवस दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे.हे फाटक दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येत असताना कोणत्याही प्रकारची नोटीस अथवा सूचना वाहनचालक यांना देण्यात आलेली नाही.त्यामुळे वाहनचालक यांच्यात संतापाची भावना असून मध्य रेल्वे विभागाच्या या निर्णयाविरुद्ध मुंबई येथील विभागीय व्यवस्थापक यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.
नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन नेरळ गावातून जाते आणि या २१ किलोमीटर लांबीचे मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता आणि रेल्वे मार्गिका यांच्यात फाटक आहेत.मात्र त्यातील दोन रेल्वे फाटके ही महत्वाची असून एक फाटक हे कर्जत कल्याण राज्यमार्ग तर दुसरे फाटक हे माथेरान नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावर आहे. मिनी ट्रेन ये जा करीत असताना या दोन्ही फाटकातील गेट बंद केली जात असतात.त्यामुळे मिनी ट्रेन यांची ये जा सुरू असताना वाहनांची काही वेळासाठी वाहतूक बंद करणे योग्य आहे.मात्र नेरळ पाडा भागातील फाटक हे रेल्वे अभियांत्रिकी विभागाने स्थानिक वाहनचालक यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता बंद केला.नऊ एप्रिल पासून हे फाटक वाहनाच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
Ratnagiri News : आंजर्लेमधील कड्यावरच्या गणपती मंदिरातील दानपेटी फोडून चोरी; भक्तांमध्ये संताप
त्या भागात असलेल्या सांडपाणी व्यवस्थेचा मार्ग तयार करण्यासाठी हे फाटक बंद करण्यात आले.त्या ठिकाणी पावसाळ्यातील पाणी वाहून जाण्यासाठी तसेच सांडपाणी वाहून जाण्यासाठी सिमेंट मोऱ्या टाकण्यात आल्या.त्यानंतर त्या भागातील खोदलेल्या ठिकाणी काँक्रीटीकरण करण्यात आले आणि या सर्व कामासाठी मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली.गेली पाच दिवस हा रस्ता वाहनांच्या वाहतुकीस बंद आहे.त्याचा मोठा फटका पाडा विभागातील स्थानिकांना बसला आहे.
अभियांत्रिकी कामासाठी फाटक बंद करण्यात आल्याने या भागातील रहिवाशी यांची वाहने अडकून पडली आहे.अनेकांना आपली चारचाकी वाहने घरी आणता आली नाही तर अनेकांना आपली वाहने घरातून बाहेर काढता आली नाहीत.त्यामुळे रेल्वे विभागाच्या या कामाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.त्यातच दुसरी महत्वाची आणि गंभीर बाब म्हणजे नेरळ येथील पाडा येथील मिनी ट्रेन फाटक बंद करण्यासाठी कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा सूचना फलक रेल्वे कडून या भागात आजपर्यंत लावण्यात आलेला नाही.फाटक वाहनाच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे याची माहिती रेल्वे कडून आधी देण्यात आली असती तर अनेक वाहनचालक यांनी आपली वाहने ही आधीच नियोजित स्थळी ठेवून दिली असती.
त्याचवेळी आपल्या नियोजित कामासाठी वाहनांच्या व्यवस्था करून ठेवता आली असती.मात्र मध्य रेल्वे कडून कोणत्याही प्रकारची सूचना देण्यात आली नव्हती आणि त्यामुळे पाडा भागातील बहुसंख्य रहिवाशी यांची वाहने अडकून पडली आहे.त्यामुळे निर्माण झालेली गैरसोय पाच दिवस झाले तरी दूर होण्याचे नाव घेत नाही. रेल्वे प्रशासनाच्या या अनागोंदी कारभाराबद्दल मध्य रेल्वे विभागीय महाव्यवस्थापक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. रेल्वे कडून घेण्यात आलेला ब्लॉक यांची माहिती प्रशासनाने स्थानिकांना का दिली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.नेरळ येथील मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी विभागाने कोणत्या आधारे फाटक वाहतुकीस बंद करण्याचा हा निर्णय घेतला? याविषयी विभागीय महाव्यवस्थापक कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.






