कर्जत/ संतोष पेरणे : कर्जत तालुक्यातील ठाकूरवाडी गाव हे मुंबई पुणे रेल्वेमार्गातलगत वसलेलं आहे. कर्जतची हद्द असलेलं हे शेवटचे गाव असल्याचं म्हटलं जातं. या ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे आवार सौर दिव्यांनी उजळून गेले आहे. चिराग फाऊंडेशन या संस्थेने गावातील चौक उजळविण्यासाठी शाळेसाठी असे एकूण सहा सौर दिवे दिले आहेत.दरम्यान, शाळेच्या आवारातील रात्रीच्या वेळी दिव्याचा उजेड पाहून हे सौर दिवे कोणी बसवले असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
मुंबई पुणे रेल्वे मार्गावर स्टेशन ठाकूरवाडी हे गाव असून बीड ग्रामपंचायत मध्ये असलेल्या या गावातील रायगड जिल्हा परिषदेची शाळा रात्रीच्या वेळी अंधारात असते.शाळेच्या परिसरात मोठी मोकळी जागा असून देखील रात्रीच्या वेळी अंधार असल्याने तेथे गप्पा मारण्यासाठी किंवा कोणते खेळ खेळण्यासाठी कोणालाही बसता येत नाही.ही समस्या चिराग फाऊंडेशन या संस्थेकडे राज्यातील प्रयोगशील शिक्षक वेच्या गावित यांच्याकडून उपस्थित करण्यात आली होती.त्यानंतर चिराग फाऊंडेशन चे काही पदाधिकारी स्टेशन ठाकूरवाडी मध्ये आले आणि त्यांनी गावाची पाहणी केली.गावात वीज आहे पण गावातील लोकवस्ती मधील चौक हे कायम अंधारात आहेत,तसेच शाळेच्या आवारातील अंधार पाहून एक नाहीतर चक्क सहा सौर ऊर्जेवर चालणारी दिवे भेट देण्याचा निर्णय या फाउंडेशनने घेतला.
मोलमजुरी करणारे स्टेशन ठाकूरवाडी गावातील ग्रामस्थ दिवसा बाहेर असतात. त्यांच्या अनुपस्थितीत चिराग फाऊंडेशन चे कार्यकर्ते सोलर पॅनल घेवून पोहचले आणि त्यांनी सिमेंट खडी यांच्या साहाय्याने सर्व सहा सौर दिवे बसवून गावातून आपले कामाचे ठिकाण गाठले.इकडे गावात सायंकाळी घरी पोहचले ग्रामस्थ गावातील पाच चौकात बसविलेले आणि रात्री साडे सात वाजता नेहमीच्या अंधाराच्या ठिकाणी दिव्याचा प्रकाश पाहून आनंदले.त्यात गावातील जिल्हा परिषद शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गोविंद शांताराम कवटे यांना शाळेचे आवार दिव्याने उजळलेले पाहून आनंद झाला.या गावातील शाळेवर प्रेम करणारे राज्याच्या पुस्तक मंडळावर असलेले शिक्षक वेच्या गावित यांना संपर्क केल्यावर सौर दिवे कोणी बसवले याचे गुपित उलगडले आहे. शाळेतील संजय राठोड, ज्ञानेश्वर येळदरे याकामी सहकारी शिक्षकांचे योगदान मोलाचे राहिले आहे.
आम्हाला सौर दिव्यांचे महत्व गावातील चौका चौकात लावलेले दिवे यांच्यामुळे कळले आहे.ते दिवे बसविणारे यांना आम्ही शारीरिक मदत करू शकलो नाही की ते सोलर पॅनल उभारले जात असताना श्रमदान करू शकलो नाही अशी खंत आम्हाला लागून राहिली आहे.मात्र जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर आम्ही चिराग फाऊंडेशन चे अधिकारी यांना बोलावून घेऊ आणि त्यांचा आदर सत्कार करू, असं गावकऱ्यांनी सांगितलं आहे.