कसहेडी बोगद्याला गळती (फोटो- istockphoto)
कशेडी घाटातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी, प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या या बोगद्याचे काम पूर्णत्वास गेले असले, तरी पावसाळ्यातील पाणीगळतीचा प्रश्न अद्याप कायम आहे. बोगद्याच्या छतावरून आणि भिंतींवरून ठिकठिकाणी पाण्याचे फवारे रस्त्यावर पडत असल्याने आतील रस्ता निसरडा होत आहे. त्यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका वाढला आहे.
गळती रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग, संबंधित कंत्राटदार कंपनीकडून विविध तांत्रिक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आयआयटीच्या तज्ज्ञांकडून सर्वेक्षण, केमिकल ग्राऊंटिंग, ड्रेनेज व पन्हाळी व्यवस्था, वॉटरप्रूफिंग, पीव्हीसी मेम्ब्रेन तसेच फायबर शीटचे अस्तर अशा उपायांचा अवलंब करण्यात आला. मात्र, मुसळधार पावसात या उपाययोजनांची प्रभावीता अपुरी ठरत असल्याचे सध्याच्या परिस्थितीतून दिसून येत आहे. बोगद्यातील पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने न झाल्यास रस्त्यावर पाणी साचण्याबरोबरच वाहनांच्या टायरची पकड कमी होण्याची शक्यता असते.
गणेशोत्सव काळात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने प्रशासनाने हा प्रश्न केवळ तात्पुरत्या मलमपट्टीने न सोडवता कायमस्वरूपी तांत्रिक उपाय करणे आवश्यक आहे. कशेडी बोगदा सुमारे ५०२ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा भाग असून, २ समांतर बोगद्यांची लांबी प्रत्येकी सुमारे २ किलोमीटर आहे. बोगद्यांना जोडणाऱ्या अॅप्रोच रोडसह संपूर्ण प्रकल्पाची लांबी सुमारे ९ कि. मी. आहे. एवढ्या मोठ्या खर्चाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पात पाणीगळतीसारखा मूलभूत प्रश्न कायम राहणे ही चिंतेची बाब असल्याची भावना वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.
कशेडी बोगदा व जोडरस्त्यांच्या मूळ प्रकल्पासाठी सुमारे ५०२ कोटी रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला आहे. गळती रोखण्याचे काम दोष दायित्व कालावधीअंतर्गत येत असल्याने त्याची दुरुस्ती व देखभाल कंत्राटदार कंपनीकडून करण्यात येणे अपेक्षित आहे. त्यामुळे या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने स्वतंत्र अतिरिक्त खर्च घोषित केलेला नाही.






