रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अक्षरश: कहर; आतापर्यंत 38.32 टक्के पावसाची नोंद
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून, चालू हंगामातील पावसाची टक्केवारी वेगाने वाढत आहे. १ जून २०२६ ते ८ जुलै २०२६ या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १२८९.१४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत झालेल्या पावसाच्या तुलनेत हे प्रमाण लक्षणीय असून, आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३८.३२ टक्के पाऊस झाला आहे.
८ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिला आहे. यामध्ये खेड तालुक्यात सर्वाधिक ७२.३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ चिपळूण तालुक्यात ५३.८० मिमी आणि दापोली तालुक्यात ५३.१० मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या इतर भागांतही पावसाची नोंद सुरू असून, संगमेश्वरमध्ये ४८.७० मिमी, मंडणगडमध्ये ४२.६० मिमी, लांजा तालुक्यात ३६.९० मिमी, राजापूरमध्ये २६.४० मिमी, गुहागरमध्ये २४.६० मिमी आणि रत्नागिरी तालुक्यात १७.३० मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्याची पावसाची एकूण सरासरी ३८.३२ टक्के इतकी असून, मागील वर्षीच्या याच कालावधीतील ३१.६८ टक्क्यांच्या तुलनेत यंदा पावसाने चांगलीच आघाडी घेतली आहे.
जगबुडी नदी इशारा पातळीवर
खेड येथील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून ती ६.९० मीटरवर वाहत आहे, तर तिची धोका पातळी ७.०० मीटर आहे. उर्वरित नद्यांची स्थिती सध्या नियंत्रणात आहे. यामध्ये वाशिष्ठी नदी चिपळूण-बाजार पुलाजवळ ३.९६ मीटर, शास्त्री नदी संगमेश्वर-शास्त्री पुलाजवळ ३.७० मीटर आणि सोनवी नदी संगमेश्वर बस थांबा शेजारी ३.४० मीटर पातळीवर वाहत आहे.
प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा
लांजा येथील काजळी नदी अंजणारी पुलाजवळ १४.४० मीटर, तर मुचकंदी नदी भांबेद पुलाजवळ १.४५ मीटर पातळीवर आहे. राजापूर येथील कोदवली नदी १.९५ मीटर आणि संगमेश्वर येथील बावनदी तळेकांटे बस थांब्याजवळ ६.६६ मीटर पातळीवर वाहत आहे. जरी सध्या अन्य नद्या धोक्याच्या पातळीखाली असल्या तरी जगबुडी नदीची वाढती पातळी पाहता नदीकाठच्या परिसरासाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.






