Shaktipeeth Express News: वाळव्यातील एक इंच जमीनही देणार नाही; शक्तीपीठ विरोधी शेती बचाव संघर्ष समितीचा इशारा
शक्तीपीठ महामार्गाविरोधात पत्रकार परिषदेला बी.जी.पाटील (बळीराजा शेतकरी संघटना), कॉ. धनाजी गुरव (श्रमिक मुक्ती दल लोकशाहीवादी), शंकर महापुरे (राज्य उपाध्यक्ष दलित महासंघ), कॉ. दिग्विजय पाटील (श्रमिक मुक्ती दल लोकशाहीवादी), प्रा. रणजित चव्हाण (पुरोगामी संघटक), अजित हवालदार (संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष) आणि संतोष गोठणकर (धरणग्रस्त संघटना) यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रश्नी २७ फेब्रुवारीला ईश्वरपूर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. डॉ.भारत पाटणकर म्हणाले, “देवधर्माच्या नावाखाली शक्तीपीठाचा मुलामा देऊन दोन चार भांडवलदारांच्या फायद्यासाठी लाखो शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा हा डाव आहे. कृष्णा–वारणा खोऱ्यातील सुपीक जमीन, सिंचन योजना, धरणग्रस्त पुनर्वसन, ग्रामीण रस्ते आणि गावांचा नैसर्गिक संपर्क तोडणारा हा महामार्ग म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राच्या मानेवरचा फास आहे.
“वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी,नवे व जुनेखेड वाळवा, उरुण, येडेनिपाणी,कामेरी,येलूर,इटकरे कुरळप, ऐतवडे मार्गे हा शक्ती मार्ग कोल्हापूर जिल्ह्यात जाईल. पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा रस्ता तिकडे तीव्र विरोध आहे म्हणून बदलला आणि वाळवा तालुक्यात आणला गेला. तीव्र विरोध हाच निकष असेल तर आम्ही त्याला तीव्र विरोध करू”
बी. जी. पाटील म्हणाले, “या महामार्गामुळे पूरधोका वाढणार आहे, पाणी साचून शेती नापीक होणार आहे, ऊस व इतर पिकांच्या वाहतुकीवर गंभीर परिणाम होणार आहे. सरकारने हा प्रकल्प तात्काळ रद्द केला नाही, तर शेतकरी, शेतमजूर, धरणग्रस्त आणि कष्टकरी जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
अपडेटेड Suzuki Access झाली लाँच! आता ‘या’ सेफ्टी फिचरमुळे तुमचा प्रवास होईल अधिकच सुरक्षित
सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत. शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा किंवा विरोध याबाबत कोणत्याही पक्षाला किंवा नेत्याला गावागावांत जाब विचारला जाईल. अन्यथा थेट उमेदवारांनी आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी धनाजी गुरव यांनी केली. सर्व राजकीय पुढाऱ्यांनी आपली भूमिका जाहीर करताना
समर्थन दिले तर महामार्ग बाधित गावातून एकही मत देणार नसल्याचे यावेळी जाहीर केले गेले.






