फोटो सौजन्य- सोशल मीडिया
बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत असून त्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन छेडण्यात आले. माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर,कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेधाचे फलक झळकावत बांग्लादेश सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. तसेच हिंदूंच्या सन्मानासाठी केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने यावर कठोर भूमिका घेण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे कि, बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. तेथील मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. हिंदू महिलांवर देखील अमानविय पद्धतीने अत्याचार होत आहेत. हि बाब अत्यंत दुःखदायक असून सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या घटनेचा आम्ही निषेध करीत आहोत. केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घेऊन बांग्लादेशामध्ये हिंदूंच्या मूलभूत मानवाधिकाराचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक,संघटक बबन बोभाटे, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,उपनेत्या जान्हवी सावंत यांसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
बांग्लादेशात अल्पसंख्य समुदायावर अत्याचार
बांग्लादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेतून हटवल्यानंतर बांग्लादेशामध्ये अल्पसंख्य समुदाय, विशेषतः हिंदूंवर हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. नुकतेच हिंदू भिक्षू चिन्मय कृष्ण दास यांना राजद्रोहाच्या खटल्याखाली अटक करण्यात आली. या घटनेचे पडसाद उमटले आहेत. भारत, ग्रेट ब्रिटन आणि इतर अनेक देशांनी बांग्लादेशातील या घटनांची कठोर शब्दामध्ये निंदा केली आहे. भारतामध्ये निर्वासित जीवन जगत असलेल्या शेख हसीना यांनी देखील सध्याच्या युनूस सरकारवर जोरदार घणाघात केला. त्यांनी या बाग्लादेशातील सरकारला “नरसंहारक” संबोधत अल्पसंख्यांकविरोधी धोरणांचा निषेध केला आहे.
बांग्लादेशाला वाचवणाऱ्या भारताला शत्रू ठरवले जात आहे तर लाखो लोकांची हत्या आणि छळ करणाऱ्या पाकिस्तानला मित्र समजले जात आहे. असा हल्लाबोल बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी युनूस सरकारवर केला आहे.
या अत्याचारांविरोधात येत्या काही दिवसातच बांग्लादेश दूतावासावर मोठा निषेध मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे. या मोर्चामध्ये भारतातील 200 हून अधिक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागरिक समाजाच्या सदस्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. राज्यातही विविध ठिकाणी बांग्लादेशातील अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध केला जात आहे.