मंत्री मंगलप्रभात लोढांच्या पाठपुराव्याला यश; बेलासीस पुलाचे नाव आता 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर'
या पुलाचे पूर्वीचे नाव ब्रिटिश अधिकारी मेजर जनरल जॉन बेलासिस यांच्या नावावर होते. ब्रिटिशकालीन खुणा दर्शवणारे हे नाव बदलावे, यासाठी मंत्री लोढा यांनी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर सरकारने सकारात्मक निर्णय घेत पुलाला ‘पुण्यश्लोक Ahilyabai Holkar’ यांचे नाव देण्याचा निर्णय जाहीर केला.
मोडकळीस आलेल्या बेलासिस पुलाची पुनर्बांधणी नुकतीच पूर्ण झाली आहे. या पुलाचे उद्घाटन गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
या निर्णयाबाबत समाधान व्यक्त करताना मंत्री लोढा यांनी सांगितले की, पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वाखालील सरकार वसाहतकालीन काळाच्या आठवणी पुसून भारतीय वारशाचा सन्मान करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
गेल्या वर्षी जुलैमध्ये मुंबई महानगरपालिकेने जुन्या कर्नॅक पुलाचे नामांतर ‘सिंदूर ब्रिज’ असे केले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या स्मरणार्थ हे नामकरण करण्यात आल्याची माहिती मंत्री लोढा यांनी दिली.
दरम्यान, कौशल्य विकास विभागाने राज्यातील सर्व आयटीआय संस्थांना थोर संत आणि महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे.






