फोटो सौजन्य - Social Media
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी मालवण येथे स्वतंत्र अध्यासन केंद्र स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. मुंबई विद्यापीठाअंतर्गत स्थापन होणाऱ्या या अध्यासन केंद्रासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे कोकणातील ऐतिहासिक वारशाच्या अभ्यासाला नवी चालना मिळणार आहे.
या केंद्रामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या किल्ल्यांचा — सिंधुदुर्ग किल्ला, पद्मदुर्ग किल्ला, राजकोट किल्ला आणि सर्जेकोट किल्ला — शास्त्रशुद्ध व सखोल अभ्यास केला जाणार आहे. ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन, संशोधन प्रबंध लेखन, व्याख्यानमाला आयोजन, युवा संशोधकांना मार्गदर्शन तसेच वारशाचे दस्तावेजीकरण अशा विविध उपक्रमांवर हे केंद्र कार्य करेल. यामुळे या किल्ल्यांबाबतची प्रमाणित आणि अभ्यासपूर्ण माहिती जनतेसमोर येण्यास मदत होईल.
१२ एप्रिल २०२५ रोजी सिंधुदुर्ग किल्ल्याला ३५८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात या अध्यासनाची घोषणा करण्यात आली होती. पालकमंत्री नितेश राणे आणि स्थानिक तज्ज्ञांच्या सहकार्याने प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. शासनाने त्याचा सविस्तर अभ्यास करून या केंद्राला अंतिम मंजुरी दिली आहे.
शिवकालीन काळात हा भाग व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखला जात होता. या परिसरातील ऐतिहासिक दाखले, समुद्री संरक्षणव्यवस्था आणि किल्ल्यांची बांधणी यांचा सखोल अभ्यास करून छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि प्रभावी प्रशासन कौशल्याचा व्यापक प्रसार करण्याचा उद्देश आहे. युवकांनी इतिहासातून प्रेरणा घेऊन राज्य आणि देश घडविण्यात योगदान द्यावे, असा विश्वास मंत्री शेलार यांनी व्यक्त केला.
या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील किल्ल्यांच्या संशोधनाला नवी दिशा मिळणार असून ऐतिहासिक वारशाचे जतन, संवर्धन आणि शास्त्रशुद्ध नोंदणी अधिक बळकट होणार आहे.






