घोडबंदर किल्ल्याचे पावित्र्य धोक्यात? ‘रिल्स’च्या वाढत्या वापरावरून चिंता; कडक सुरक्षेची मागणी
घोडबंदर किल्ला हा मीरा-भाईंदर परिसराच्या ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. या किल्ल्याला भेट देण्यासाठी इतिहासप्रेमी, पर्यटक आणि नागरिक येत असतात. मात्र, अलीकडच्या काळात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिल्स आणि व्हिडीओ बनविण्यासाठी किल्ल्याचा वापर वाढत असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. काही ठिकाणी शिस्तीचे पालन न करता चित्रीकरण केले जात असल्याने किल्ल्याच्या वास्तूचे नुकसान होण्याची शक्यता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
एफआरपीची चुकीची आकडेवारी देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा; साखर आयुक्तांकडे मागणी
गड-किल्ले हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक आहेत. त्यामुळे या वास्तूंकडे केवळ पर्यटनस्थळ म्हणून न पाहता त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि पावित्र्य जपणे आवश्यक आहे, असे देशमुख यांनी सांगितले. किल्ल्याच्या परिसरात रिल्सचे चित्रीकरण, मद्यपान तसेच अन्य शिस्तभंगाच्या घटना घडत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीच्या वतीने महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. घोडबंदर किल्ल्याच्या परिसरात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
किल्ला परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवावी, आवश्यक ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था करावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. किल्ल्याच्या संवर्धनासाठी आवश्यक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांमध्ये ऐतिहासिक वारशाबाबत जनजागृती करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
घोडबंदर किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि किल्ल्याचे पावित्र्य, वास्तूचे संरक्षण तसेच ऐतिहासिक वारसा अबाधित राहण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केली आहे.






