उन्हाच्या तडाख्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल, काय आहेत नवीन वेळापत्रक?
ठाणे : उन्हाच्या तडाख्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता ठाणे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. आज, १ एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळेची वेळ सकाळच्या सत्रात प्राथमिक शाळांसाठी सकाळी ०७.०० ते ११.१५ वेळापत्रक तयार करण्यात आल्याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली तर माध्यमिक शाळांसाठी ०७.०० ते ११.४५ वेळापत्रक तयार करण्यात आल्याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहितुले यांनी दिली आहे.
राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी जिल्हा परिषद शाळाचे वेळ बदल करण्यात आले असून शिक्षक व पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे.
१. उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी मैदानी/शारीरिक हालचाली टाळाव्यात. बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत.
२. विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे.
३. वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करणे.
४. विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करुन द्यावे.
५. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाणे.
६. पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे.
७. डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर करणे.
८. उन्हात बाहेर जाताना शूज किवा चप्पल घालणे.
९. उन्हात बाहेर पडणे टाळणे.
“उन्हाची तीव्रता पाहता शनिवारच्या शाळेची वेळ बदलण्यासंदर्भात समितीचा पाठपुरावा चालू होता. विद्यार्थीहित लक्षात घेऊन शनिवारच्या शाळेच्या वेळेत वेळीच बदल करावा अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे तसेच खासदार सुरेश म्हात्रे यांच्या सहकार्याने हे शक्य झाले.”,अशी प्रतिक्रिया प्राथमिक शिक्षक समिती ठाणेचे अध्यक्ष विनोद लुटे यांनी दिली आहे.