वसई विरारमधील हृदयद्रावक घटना (फोटो सौजन्य - Gemini Google AI)
मिळालेल्या माहितीनुसार जिग्नेश विजय पवार (वय ८) आणि आयुष मुकेश पवार (वय १५) आणि अजून एक मुलगा असे तीन मुले दुपारच्या सुमारास खाणीत साचलेल्या पाण्यात आंघोळ करण्यासाठी गेले असता जिग्नेशचा पाय सटकल्याने तो पाण्यात बुडाला लागला. आयुष्य त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तो देखील पाण्यात बुडाला तेव्हा तिसरा मुलगा जो होता त्यांनी त्या दोन्ही मुलांच्या घरच्यांना सांगितले तेव्हा ही गोष्ट उघड झाली. प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र पाण्याची खोली व तळाचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात गेले आणि बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अग्निशमन दलाची शोधमोहीम
घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले. त्यानंतर वसई विरार महापालिका अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी खाणीत उतरून सखोल शोधमोहीम राबवली.
दीर्घ प्रयत्नांनंतर जिग्नेश विजय पवार (वय ८) याचा मृतदेह हाती लागला. मात्र आयुष मुकेश पवार (वय १५) याचा उशिरापर्यंत शोध सुरू असून अग्निशमन दलाकडून पाण्यात सखोल तपासणी करण्यात येत आहे. खाण परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवत बचावकार्य सुरळीत पार पाडले.
Nalasopara Crime: नालासोपाऱ्यात पहाटेचा थरार! मनोरुग्ण भावाकडून बहिणीची कोयत्याने हत्या, आईलाही…
मूळ कुटुंब इंदूरचे
मृत मुलांची कुटुंबे मूळची इंदूर (मध्य प्रदेश) येथील असून काही दिवसांपूर्वी कामानिमित्त मनोर परिसरात वास्तव्यास आली होती. संबंधित कुटुंबे भटक्या जमातीतील असल्याची माहिती पुढे येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबांवर शोककळा पसरली असून परिसरात शोकमय वातावरण आहे. दरम्यान हीच खाण यापूर्वीही जीवघेणी ठरली आहे. सुमारे आठ महिन्यांपूर्वी एका महिलेचा कपडे धुण्यासाठी गेलेल्या अवस्थेत पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. तरी देखील संबंधित खाण पूर्णतः बंद करण्याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याची चर्चा स्थानिक नागरिकांतून होत आहे.
निष्काळजीपणाचा प्रशासनावर आरोप
स्थानिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. बंद असलेल्या आणि पाण्याने भरलेल्या खाणींना सुरक्षित कुंपण घालणे, इशारा फलक लावणे तसेच नागरिकांना प्रवेशबंदी करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. विशेषतः लहान मुले व युवक अशा ठिकाणी खेळण्यासाठी किंवा पोहण्यासाठी जात असल्याने भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.
सध्या वसई विरार महापालिका अग्निशमन दल आणि मनोर पोलिसांकडून शोधकार्य आणि पुढील तपास सुरू असून, आयुष पवार याचा शोध लागताच अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत. अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून होत आहे.






