मान्सूनपूर्व आराखड्यापूर्वीच अवकाळीने केले कोट्यवधींचे नुकसान
सातारा : साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला मान्सूनपूर्व आराखडे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यापूर्वीच अवकाळीने सातारा जिल्ह्याला असा तडाखा दिला की, आराखडे सादर करायला वेळच मिळाला नाही. त्यापूर्वीच सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये यंदा गेल्या पाच वर्षात प्रथमच मान्सूनपूर्व अवकाळी सातारा जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला. पुढील ७२ तास हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावर जोरदार पावसामुळे महामार्गावर पाणी येऊन वाहतूक ठप्प होणे किंवा वाहने पाण्यात बुडून इंजिनचे नुकसान होणे, असे अनेक प्रकार घडले आहेत. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यातील राज्य व जिल्हा महामार्गालगतच्या मोऱ्या रस्त्यांची बांधकामे तसेच दरड प्रवण आणि पूरप्रवण क्षेत्रांच्या संदर्भामध्ये आपत्ती व्यवस्थापनाला सूचना दिल्या.
धोकादायक होर्डिंग फ्लेक्स तातडीने उतरवणे, धोकादायक इमारतींना नोटिसा बजावणे, त्या-त्या कार्यक्षेत्रात तहसीलदारांनी तत्काळ पंचनामे करून संबंधितांना त्याचा इशारा इत्यादी कामे निर्देशित केली होती. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वीच अवकाळीचा तडाखा बसून जिल्ह्यामध्ये साधारण ५ कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
ओढ्याचा गळा आवळल्याने पाणी घरात
गोडोली कामाठीपुरा व रामराव पवार नगर येथे रुंदावलेल्या पात्रातून ओढ्यातील पाणी लोकांच्या घरामध्ये शिरण्याचे प्रकार घडले. साईबाबा मंदिर परिसरामध्ये बेकरी तत्सम घरांमध्ये पाणी शिरल्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गोडोली येथील शिवनेरी कॉलनीमध्ये सुद्धा पाणी घरात घुसून संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
आपत्ती व्यवस्थापनाकडून माती काढण्याचे काम
याबाबतच्या लेखी तक्रारी सातारा पालिकेकडे दाखल झाले आहे. पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सध्या रस्त्यावरील माती काढण्यात गुंतला आहे. सातारा शहरातील मुख्य सात ओढे आणि अन्य पाण्याचे प्रवाह त्यांची स्वच्छता हाती घेण्यात आली आहे. सध्या तरी ओढ्यांनी रस्त्यावर नवीन टाकलेली वाळू व माती हटवण्याचे काम सुरू आहे.