शिक्रापूर : येथील वेळ नदी पूर्णपणे कोरडी ठणठणीत झाल्यामुळे गावातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वेळ नदीला पाणी सोडण्याची मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी चासकमान विभागाकडे केली होती. तसेच ‘दै. नवराष्ट्र’ने ‘ऐन उन्हाळ्यात वेळ नदी कोरडी’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल नुकतेच चासकमान धरणातून वेळ नदीला पाणी सोडण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्याबाबत अखेर दिलासा मिळाला.
शिक्रापूर येथून वाहणाऱ्या वेळ नदीच्या पाण्यावर गावासह परिसरातील वाड्या वस्त्यांची पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. तसेच या वेळ नदीला पाणी असल्यास या परिसरातील सर्व विहिरींची पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिकांना देखील शेतीतील पिकांना पाणी देणे शक्य होते. शिवाय नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी सोय होत असते.
ग्रामस्थांकडून ‘दै. नवराष्ट्र’चे आभार
सध्या वेळ नदी पूर्णपणे कोरडी पडून या नदीवर असलेले सर्व बंधारे कोरडे पडले आहेत. नागरिकांना पाण्याचा दुष्काळ जाणवू लागला आहे. त्यामुळे येथील वेळ नदीला चासकमानचे पाणी सोडण्याची मागणी शिक्रापूरचे उपसरपंच रमेश थोरात यांनी चासकमान विभागाकडे केली होती. याबाबत नुकतेच ‘दै. नवराष्ट्र’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत चासकमानमधून वेळ नदीला पाणी सोडण्यात आले. त्यामुळे सध्या वेळ नदी तुडुंब भरली असून, बंधारे देखील फुल झाले आहेत. उपसरपंच रमेश थोरात, ग्रामपंचायत सदस्य मयूर करंजे यांनी ‘दै. नवराष्ट्र’ तसेच चासकमान विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.






