Photo Credit- Social Media सांगली जिल्ह्याला एकही मंत्रिपद का मिळाले नाही
प्रवीण शिंदे, सांगली : एकेकाळी राज्याच्या कारभार ज्या जिल्ह्यातून चालायचा, एकावेळी तीन चार मंत्रीपदे असणाऱ्या सांगली जिल्ह्यात महायुतीच्या 3.0 मंत्रिमंडळात एकालाही स्थान मिळाले नाही, त्यामुळे सांगली जिल्ह्याला दुसऱ्यांदा मंत्रिपदाचा दुष्काळ पडला आहे. सांगली जिल्ह्याने महायुतीला भरभरून दिले, मात्र महायुतीने सांगलीला एकही मंत्रिपद दिले नाही, त्यामुळे जिल्ह्यात नाराजी पसरली आहे.
रविवारी नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी झाला, त्यात सांगलीतून एकही आमदार नव्हता. गेल्या तीन दशकांत दुसऱ्यांदा सांगलीच्या आमदाराशिवाय मंत्रिमंडळ असेल. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठपैकी पाच जागांवर महायुतीचे आमदार निवडून आलेले असतानाही जिल्ह्याला मंत्रिमंडळात डावलण्यात आले आहे. सलग पाचव्यांदा निवडून आलेले सुरेश खाडे यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित मानला जात होता. पण, त्यांनाही अखेरपर्यंत पक्षश्रेष्ठींचा फोन आला नाही. सांगलीतून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले सुधीर गाडगीळ, खानापुरातून प्रथमच निवडून आलेले एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जाणारे सुहास बाबर आणि जतमधून विजयाचा गुलाल उधळलेले गोपीचंद पडळकर आणि सुरेश खाडे अशाचौघांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची अटकळ बांधली जात होती. पण, कोठेतरी माशी शिंकली आणि एकाच्याही गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकली नाही.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा महायुतीचे सरकार स्थापन झाले, त्यावेळी देखील सांगलीला दुजाभाव दिला गेला होता, त्यावेळी शेवटच्या टप्प्यात सदाभाऊ खोत यांना कृषिराज्यमंत्री तर सुरेश खाडे यांना कामगार मंत्री पदाची संधी मिळाली, मात्र कमी काळात त्यांना म्हणावं तितकं काम करता आलेच नाही.
सांगली जिल्हा हा राजकारणाची पांढरी म्हणून ओळखली जाते, वसंतदादा पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री पद, आर.आर.पाटील यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री, डॉ.पतंगराव कदम यांच्यामाध्यमातून सहकार, परिवहन, वनमंत्री, तर जयंत पाटील यांच्यामाध्यमातून अर्थ, गृह अशी महत्वाची मंत्रीपदे सांगली जिल्ह्यात असल्याची, त्यामुळे राज्याला धोरण देणाऱ्या जिल्ह्यत मंत्रीदाचा दुष्काळ पडला आहे.
Sabhal Mandir update: देवी पार्वतीची खंडित मुर्ती, 500 वर्षे जुनी विहीर; संभलच्या खोदकामात काय काय
सांगलीला मंत्रिपद मिळाले नसल्याने पालकमंत्री दुसऱ्यांदा बाहेरचा पालकमंत्री होणार आहे. साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले, शंभूराज देसाई व कोल्हापुरातून हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद मिळाले आहे. यापैकी एखाद्याकडे सांगलीचे पालकमंत्रिपद सोपविले जाऊ शकते. आयात सांगलीला पुरेसा वेळ देणार का? हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. यापूर्वी कोल्हापुरातून चंद्रकांत पाटील, सोलापूरातून सुभाष पाटील मंत्री असताना त्यांच्याकडे सांगलीचे पालकमंत्रिपद होते. पण, ते सांगलीला पाहुण्यासारखे कधीतरी यायचे आणि घाईगडबडीत बैठका उरकायचे त्यामुळे आता पुन्हा तेच सांगलीकरांच्या नशिबी येणार आहे.
” सांगली जिल्ह्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस दुर्दैवी आहे. महायुती सरकारने २०१४ नंतर पुन्हा एकदा जिल्ह्याला मंत्रिपदापासून दूर ठेवले आहे. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असला, तरी मंत्री नसल्याने जिल्ह्याच्या विकासात बाधा येता कामा नये. त्यासाठी काँग्रेस सतत आक्रमक भूमिका घेत राहील. भाजपने जिल्ह्यावर कसला सूड उगवलाय, हे समजण्यापलीकडे आहे.”