'आई कुठे काय करते' मालिकेचं नाव कसं सुचलं ? मालिकेत मिलिंद गवळीला कोणी कास्ट केलं ?
‘आई कुठे काय करते’ मालिकेचा आज शेवटचा दिवस आहे. अभिनेता मिलिंद गवळीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत मालिकेबद्दलच्या अनेक आठवणी शेअर केलेल्या आहेत. शिवाय मालिकेचं नाव कसं सुचलं ? मालिकेचं कथानक कसं सुचलं ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अभिनेता मिलिंद गवळीने पोस्टमधून दिली आहेत.
पोस्ट शेअर करत अभिनेता मिलिंद गवळीने लिहिलंय की,
“Memories/आठवणी मागे राहतात, गेल्या पाच वर्षाच्या असंख्य आठवणी मागे राहिल्या आहेत, हे आमचं कला क्षेत्र किती मजेशीर आहे, एका माणसाच्या डोक्यात,एक विचार येतो, एक कल्पना सुचते, मग तो एका लेखकाला ती कल्पना लिहून काढायला सांगतो. “आई कुठे काय करते” या मालिकेची कल्पना, बंगाली लेखिकेच्या लीना गंगोपाध्याय यांच्या डोक्यात आली त्यावरून “श्रीमोई” बंगाली मालिका तयार झाली, मग स्टार प्रवाह आणि राजनशाही यांनी तशीच मालिका मराठी प्रेक्षकांसाठी करावी असा विचार केला. “आई कुठे काय करते” हे शीर्षक स्टार प्रवाहचे मुख्य अधिकारी सतीश राजवाडे यांनी सुचवलं, राजनजींनी नमिता वर्तक हिच्याकडे ही मालिका करायची जबाबदारी दिली, गोष्ट तयार झाली त्यातले पात्र तयार झाले आणि मग महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचं कास्टिंग, आणि अनिरुद्ध देशमुख नावाच्या मुख्य पात्र साठी नमिताने मला विचारलं, कमीत कमी चार-पाच कलाकारांची नावे त्यांनी काढली असतीलच, पण त्यात नमिताने माझी निवड केली, राजनजींची त्यांच्या ऑफिसमध्ये भेट झाली, तेव्हा राजनजींच्या मनात मी अनिरुद्ध साकारू शकेन की नाही याबद्दल थोडी शंका मला जाणवली, पण नमितावर विश्वास ठेवून त्यांनी माझ्या कास्टिंगला होकार दिला. नंतर माझ्या लक्षात आलं की त्यांची शंका अगदी बरोबर होती कारण “श्रीमोई” मधला अनिरुद्ध फारच भारदस्त authoritative personality होता. पण त्या बिचाऱ्या मराठीतल्या अनिरुद्धच्या नशिबात मी होतो. त्याला तो तरी काय करणार, पण १४९१ भाग पूर्ण होऊन आज ही मालिका निरोप घेत आहे, ही अनिरुद्धची भूमिका मी साकारू शकलो की नाही मला माहिती नाही, पण प्रामाणिक प्रयत्न मात्र नक्की केला, अजून खूप काही करता आलं असतं, पण आता वेळ निघून गेली, आज “आई कुठे काय करते” या मालिकेचा प्रवास संपला, migratory birds सारखे सगळे उडून गेले, पुन्हा एकत्र येतील की नाही माहित नाही, “लगान” ची टीम पुन्हा तयार होत नसते, आता फक्त मागे आठवणी ठेवून, सगळे आपल्या पुढच्या प्रवासाला निघून गेले, “आई कुठे काय करते” या मालिकेने सगळ्यांनाच भरभरून दिल, माझ्यासाठी राजन शाही, नमिता वर्तक, डी के पी परिवार, सतीश राजवाडे आणि स्टार प्रवाह परिवार यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, सातत्याने सांभाळून घेतलं, प्रोत्साहन दिलं, आधार दिला, इतक्या लांबचा प्रवास गाठण्यासाठी ताकद दिली, त्यांचा मी ऋणी आहे. माझ्या अफलातून सहकलाकारांचा आणि संपूर्ण “आई कुठे काय करते” च्या टीमचा खूप खूप आभारी आहे.”