'काही लोक घरात बसून पोस्ट लिहितात'; राज ठाकरेंच्या टीकेला अमित साटम यांचा पलटवार
मुंबईतील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच, दुर्घटनांवरील एका व्हायरल व्हिडिओवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र लिहून मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांच्या कथित असंवेदनशील वर्तनावर टीका केली होती. त्यानंतर आता अमित साटम यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबईतील विविध भागांचा दौरा करून पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अमित साटम यांनी विरोधकांवर निशाणा साधला. प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेत नागरिकांना तातडीने मदत मिळावी, तसेच सर्व भाजप पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी मैदानात उतरून काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना अमित साटम म्हणाले, “काही लोक घरात बसून पोस्ट लिहितात आणि स्टेटमेंट करतात. गेल्या २५ वर्षांत उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मुंबईकरांनी पावसात रस्त्यावर उतरून काम करताना पाहिलं आहे का?”
ते पुढे म्हणाले, “आमचे महापौर गल्लोगल्ली फिरत आहेत. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून मुंबईकरांची सेवा करत आहोत. मात्र काही लोक फक्त सोशल मीडियावर पोस्ट लिहिण्यापुरतेच मर्यादित आहेत.”
व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत अमित साटम यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. “त्या घटनेबाबत मी आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून फेक नरेटिव्ह पसरवून मला जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना ते करू द्या,” असे ते म्हणाले.
विरोधक माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून लक्ष भरकटवत आहेत. आम्ही घरात बसून पोस्ट लिहीत नाही, तर रस्त्यावर उतरून काम करतोय. विधानसभेत आवाज उठवून आम्ही २ दिवसांत ७ मनपा अधिकाऱ्यांचे निलंबन करून दाखवले! पावसात कधी उद्धव, आदित्य किंवा राज ठाकरेंना मुंबईकरांनी रस्त्यावर पाहिले आहे का?… pic.twitter.com/cRSsKB0CzF — Ameet Satam (@AmeetSatam) July 4, 2026
अमित साटम यांनी यावेळी महापालिकेच्या राजकारणाचाही उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, “हे दोन्ही पक्ष, ज्यांनी पूर्वी युती केली होती, त्यांनी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील समन्वयासाठी आम्हाला संपर्क केला होता. मात्र आम्ही तो प्रस्ताव धुडकावून लावला. त्यामुळेच त्यांचा राग अनावर झाला आहे.”
ते पुढे म्हणाले, “२५ वर्षे जे लाभ त्यांना मिळत होते, ते आता मिळत नाहीत. त्यामुळेच ते नाराज असून त्या नाराजीतून मला लक्ष्य केलं जात आहे.”
मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाबाबत बोलताना अमित साटम म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुंबईकरांच्या हितासाठी आम्ही मैदानात उतरून काम करत राहू.”
दरम्यान, अमित साटम यांच्या व्हायरल व्हिडिओवरून सुरू झालेला वाद अद्याप कायम असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच आहे.






