'रामरक्षा वाचता येत नाही आणि आंदोलन करता'; रामरक्षा आंदोलनावरून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
दिल्लीतील जंतर-मंतर येथे शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत रामरक्षा आंदोलनावरूनही निशाणा साधला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “माझी एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी किमान दोन पान रामरक्षेची वाचावी. रामाच्या नावाने आंदोलन करणं योग्य नाही. मागच्या वेळी त्यांना रामरक्षा म्हणता आली नव्हती. त्यांची तयारी असेल तर मीही त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे. मला पूर्ण रामरक्षा येते. समजा येत नसती, तरी किमान वाचता तरी आली पाहिजे. तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षा वाचताच येत नाही, मग हे कसले आंदोलन?”
याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करत, “ते सध्या हताश आणि फ्रस्ट्रेड व्यक्ती झाले आहेत,” असेही म्हटले.
राहुल गांधींच्या TET पेपरफुटीवरील टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर; ‘आधी आपल्या पक्षाकडे बघा’
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर पाठिंबा दिल्यानंतर महायुतीतील नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे गटावर टीका करत म्हटले, “हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. त्यांचा नेहमीच बाहेरून आणि घरातून पाठिंबा असतो. ‘तुम लढो, हम कपडा संभालते है’ अशी त्यांची भूमिका असते. बुडाला जळत असताना डोंगरावर आग विझवायला धावणाऱ्या माणसासारखी उबाठाची अवस्था झाली आहे.”
शिंदे यांनी पुढे आरोप केला की, सरकारविरोधात जेव्हा जेव्हा आंदोलन उभे राहते, तेव्हा उद्धव ठाकरे गट त्याला पाठिंबा देतो. श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेशातील आंदोलनांची उदाहरणे देत उबाठा गट मुद्दाम असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचाही त्यांनी आरोप केला.






