आरएसएस पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. अजित गोपछडे यांना उद्देशून लिहिलेले अनावृत्त पत्र व्हायरल झाले आहे (फोटो -सोशल मीडिया)
Nanded News : नांदेड : नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी संबंधित व परिवारातील वेगवेगळ्या आयामामध्ये काम करणाऱ्या सहा माजी पदाधिकाऱ्यांनी राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांना उद्देशून लिहिलेले अनावृत्त पत्र सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून, यामुळे संघ (RSS) व भाजप कार्यकत्यांमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे.
संघाच्या कार्यकर्त्यांना आता भाजप नेत्यांकडून राजकीय लाभाच्या, सहकार्याच्या अपेक्षा असल्याचे यामधून अधोरेखित होत आहे. खासदार डॉ गोपछडे हे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मी स्वयंसेवक असल्याचे सांगत असतात. या पत्रामध्ये खासदार गोपछडे यांच्यावर ग्रामीण भागातील संघ पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या समस्या, कामांकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
संघ परिवाराच्या पार्श्वभूमीवर तयार झालेले नेतृत्व महणून कार्यकर्त्यांच्या डॉ. गोपछडे व्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्या पूर्ण होत नसल्याची खंत पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, अनेक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष संवादातून असा अनुभव मांडला की, खासदार किंवा त्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधणे कठीण झाले आहे.
हे देखील वाचा : श्रेयवादाचे राजकारण, भाजपात नाराजी; पक्ष संघटना कमकुवत अन् कार्यकर्ते निरुत्साही
फोन घेतला तरीही कामांची दखल घेत नाहीत
फोन घेतला तरीही कामांची दखल घेतली जात नाही, विशेषतः ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची कामे तहसील, ग्रामपंचायत, पोलिस स्टेशन, वीज खाते किंवा बँकांशी संबंधित असतात, मात्र ही साधी कामेही मार्गी लागत नसल्याने नाराजी वाढत असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, हे पत्र लिहिणारे सर्वजण प्रामुख्याने शहरी भागातील रा.स्व. संघाचे माजी पदाधिकारी असल्याने, त्यांना ग्रामीण कार्यकत्यांच्या प्रश्नांची अचानक चिंता का वाटू लागली आहे, असा सवाल आहे. त्यामुळे या पत्रामागील नेमका उद्देश काय, याबाबतही विविध तर्कवितर्काना उधाण आले आहे. हे अनावृत्त पत्र माजी जिल्हा संघचालक दत्तात्रय देबडवार, माजी विभाग कार्यवाह लक्ष्मीकांत गंजेवार, माणिक भोसले, सनतकुमार महाजन, विश्व हिंदू परिषदचे प्रखंड प्रमुख कृष्णा देशमुख आणि भाजप महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा आरती पुरंदरे यांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी सार्वजनिकरीत्या अशा प्रकारचे पत्र लिहितात, हे अपवादात्मक मानले जाते; कारण संघ परंपरेने अंतर्गत संवाद व संघटनात्मक शिस्त यावर भर देतो. त्यामुळे असे पत्र समोर येणे म्हणजे स्थानिक पातळीवरील नाराजी तीव्र झाल्याचे संकेत मानले जातात. भाजप खासदारांविरोधात थेट भूमिका घेणे हे दबाव निर्माण करून कार्यपद्धतीत बदल घडवण्याचा प्रयत्न असू शकतो.
हे देखील वाचा : साताऱ्यात महायुतीतच चुरस; जिल्हा परिषद राजकारण तापले






