नांदेड ग्रामीण भाजपमध्ये नाराजी, कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह आणि पक्षसंघटना नाही (फोटो - सोशल मीडिया)
Nanded Political News : नांदेड : जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेत महानगर, ग्रामीण दक्षिण आणि ग्रामीण उत्तर असे स्पष्ट विभाग असतानाही प्रत्यक्षात श्रेयासाठी सुरू असलेली ओढाताण उघडपणे समोर येत आहे. महानगरात होणाऱ्या कार्यक्रमांचे श्रेय ग्रामीण नेतृत्व घेत असल्यामुळे पक्षांतर्गत असंतोष वाढत असून, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात संघटना मजबूत करण्याऐवजी स्थानिक पातळीवर गटबाजी आणि निष्क्रयता वाढल्याचे चित्र आहे. दोन्ही ग्रामीण जिल्हाध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, त्यांचा कल ग्रामीण भागाकडे कमी आणि महानगरातील कार्यक्रमांकडे अधिक असल्याची चर्चा रंगत आहे.
परिणामी ग्रामीण कार्यकर्ते उपेक्षित वाटत असून, त्यांच्यात निरुत्साह वाढत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात अपेक्षित प्रमाणात संघटनात्मक कार्यक्रम राबवले जात नसताना, महानगरातील कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यावर अधिक भर दिला जात असल्याचे दिसते.
हे देखील वाचा : “खरातसोबत राजकीय लोकांचेही व्हिडीओ आहेत का? रोहित पवारांच्या प्रश्नांने उंचावल्या भुवया
ग्रामीण भागात भाजपची परिस्थिती चिंताजनक
काही दिवसांपूर्वी राबविण्यात आलेल्या ‘दीनदयाळ उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण अभियान’ मध्येही ग्रामीण भागात मर्यादित प्रतिसाद दिसून आला. मोजक्या तालुक्यांपुरते आणि मर्यादित उपस्थितीत हे अभियान पार पडल्याने कार्यकत्यामध्ये नाराजी वाढली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही स्थिती अधिक चिंताजनक मानली जात आहे.
संघटना मजबूत करण्यासाठी ग्रामीण कार्यकर्त्यांशी संवाद, समन्वय आणि विश्वासाचे नाते निर्माण करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. ६ एप्रिल रोजी पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातही महानगर कार्यालयात मोठी गर्दी दिसून आली, तर ग्रामीण भागातील कार्यालयांमध्ये अपेक्षित प्रतिसाद नव्हता.
याशिवाय, ग्रामीण कार्यक्षेत्रासाठी असलेले कार्यालय शहरातच असल्यामुळे कार्यकर्त्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार आहे.
हे देखील वाचा : सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होणार? अजित पवारांचं स्वप्न पूर्ण होणार? खासदारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
नांदेड उत्तरमध्ये पक्षाचे अस्तित्व धूसर
नांदेड उत्तर विभागात पक्षाचे अस्तित्वच धूसर होत चालल्याची चर्चा असून, नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळे संघटना कमकुवत होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. एकूणच, श्रेयवादाच्या राजकारणामुळे भाजपाच्या ग्रामीण संघटनेसमोर गंभीर आव्हान उभे टाकले असून, वेळीच योग्य पाऊले न उचलल्यास आगामी निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम दिसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.






