चिपळूण तालुक्यात शिवसेना- भाजप युती तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष, शिवसेना उबाठा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. खेर्डी जिल्हा परिषद गटात तिरंगी लढत होत असून शिवसेना-भाजप युतीतर्फे कापसाळ येथील रावी सतीश मोरे यांना उमेदवारी मिळाली आहे. रावी मोरे यांनी कापसाळ गावचे सरपंच पद भूषवले असल्याने सौ. मोरे यांना प्रशासकीय व विकासकामांची जाण आहे. विशेष म्हणजे भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत. मोरे दाम्पत्य गेल्या काही वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने जनतेशी थेट संपर्क आहे. सातत्याने संवाद देखील राहिला आहे. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत आले आहेत. याचबरोबर क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम राबवून खेळाडू व महिलांना वेळोवेळी प्रोत्साहित केले आहे. याचीच परिणीती म्हणून शिवसेना-भाजप युतीतर्फे सौ. रावी मोरे यांना उमेदवारी मिळाली आहे. युतीतर्फे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी व जाहीर होताच सौ. रावी मोरे यांनी प्रचारावर जोरदार भर दिला असून ‘ डोअर टू डोअर’ प्रचार करीत खेर्डी जिल्हा परिषद गटात प्रचाराच्या दृष्टीने रंगत आणली आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्षाच्या सौ. दिशा दाभोळकर यांनी यापूर्वी या गटाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून नेतृत्व केले आहे. यामुळे दाभोळकर यांना निवडणुकीच्या व्युव्हरचनेची माहिती आहे. शिवसेना उबाठाच्या सौ. स्वरा निलेश जावळे निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. एकंदरीत या गटात तिरंगी लढत होत असून ती चुरशीची होणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
खेर्डी गणासाठी देखील तिरंगी लढत होत आहे. या गणातून राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) पक्षाचे नितीन ठसाळे पुन्हा एकदा आपले नशीब आजमावणार आहेत. तर शिवसेना भाजप युतीतर्फे विनोद भुरण निवडणूक रिंगणात उतरले आहेत. भुरण हे गेल्या काही वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. खेर्डी ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच पद भूषवित गावाच्या विकासात योगदान दिले आहे. तर दुसरीकडे भाजपच्या माध्यमातून पक्ष वाढीसाठी देखील ते काम करीत आहेत. विनोद भुरण सध्या भाजपच्या चिपळूण ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी कार्यरत आहेत. ते आता खेर्डी पंचायत समिती गणातून आपले नशीब आजमावत आहेत. याचबरोबर शिवसेना उबाठा पक्षाकडून युवासेना चिपळूण तालुका अधिकारी उमेश खताते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. एकंदरीत या गणात ठसाळे, भुरण, खताते यांच्या तिरंगी लढत होत असून या लढतीत कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
खेर्डी जिल्हा परिषद गट अंतर्गत कापसाळ गणात देखील तिरंगी लढत होत आहे. शिवसेना- भाजप युतीकडून मिरजोळी येथील विनोद हिरे, शिवसेना उबाठा पक्षाकडून धामणवणे येथील सुभाष जाधव तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्षाकडून कामथे येथील राहुल कांबळे असे तिघेजण निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या तिघांमध्ये देखील अटीतटीची लढत होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
पेढे जिल्हा परिषद गटात तिरंगी लढत होत असून भाजप- शिवसेना युतीकडून सौ. दीप्ती महाडिक शिवसेना उबाठा पक्षाकडून सौ. मानसी महेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून सौ. सानवि स्वप्नील शिंदे निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
भाजप महिला मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्षा असलेल्या सौ. दीप्ती महाडिक यांनी यापूर्वी पेढे जिल्हा परिषद गटाच्या सदस्या म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. मागे या गटात विकासात्मक कामे राबवण्याबरोबरच जनसंपर्क कायम ठेवला आहे. यामुळे सौ. दीप्ती महाडिक यांना या गटाची चांगलीच जाण असल्याने भविष्यात या गटात आणखी कोणती विकास कामे मार्गी लावायला हवी? याचा देखील महाडिक यांच्याकडे अभ्यास आहे. तसेच त्यांचे पती दीपक महाडिक हे देखील गेल्या काही वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.
पेढे जिल्हा परिषद गटासाठी युतीच्या उमेदवार सौ. दीप्ती महाडिक यांनी पेढे गणातील युतीचे उमेदवार संदेश आयरे तर दळवटणे गणातील सौ. सायली शिंदे यांच्यासह भाजपा- शिवसेना युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी समन्वय साधून मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. तर पेढे गणातून शिवसेना उबाठा पक्षाकडून महेश महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट )पक्षाकडून मोहन शिंदे, दळवटणे गणातून शिवसेना उबाठाच्या स्वरा शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या मेघा इंगवले आपले नशीब आजमावत आहेत.






