अजित दादांच्या निधनाच्या छायेतच जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक प्रचाराला सुरुवात
धाराशिव : उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिवंगत लोकनेते अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. डोंगराएवढ्या दुःखाच्या सावलीतच राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला नाईलाजाने सुरुवात केली आहे. ढोल-ताशे, बँड, डॉल्बी, नाच-गाणे, फटाके व आतिषबाजी यांसारख्या भडक प्रकारांना फाटा देत अत्यंत मर्यादित आणि संयमित स्वरूपात प्रचार सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, काही काळ ठप्प झालेला महायुतीचा प्रचार हळूहळू पुन्हा सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
निवडणुकांच्या निष्ठुर राजकारणामुळे दुःख व्यक्त करण्यासाठीचा अवकाशही हिरावून घेतला गेला आहे. प्रमुख नेत्याच्या अचानक निधनाचे दुःख मनात ठेवतच राष्ट्रवादी, भाजपा तसेच महाविकास आघाडीतील उमेदवार, स्थानिक नेते व कार्यकर्त्यांना प्रचाराच्या रणांगणात उतरावे लागत आहे.
जिल्ह्यातील ५५ जिल्हा परिषद गटांपैकी केवळ धाराशिव तालुक्यातील बेंबळी गटातून राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवत आहे. या दुःखद पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे उमेदवार महेंद्र धुरगुडे यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. भाजपाची प्रचार यंत्रणाही मर्यादित स्वरूपात असून वैयक्तिक गाठीभेटी हाच प्रचाराचा मुख्य मार्ग अवलंबला जात आहे.
भाजपाचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे दिवंगत लोकनेते अजित पवार यांच्याशी जवळचे नाते होते. त्यामुळे त्यांच्या निधनाचा परिणाम भाजपाच्या प्रचार यंत्रणेवरही स्पष्टपणे जाणवत असून महायुतीतील कार्यकर्ते अजूनही दुःखाच्या मानसिकतेत असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीने मात्र प्रचार सभा, कॉर्नर मीटिंग्स तसेच प्रचार वाहनांद्वारे ध्वनिक्षेपकातून गाण्यांच्या माध्यमातून प्रचाराला गती दिली आहे. जिल्ह्यातील गट व गण अक्षरशः पिंजून काढत महाविकास आघाडीने ठप्प झालेल्या महायुतीच्या प्रचाराच्या तुलनेत मोठी आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. सध्या जिल्ह्यात भाजपा व राष्ट्रवादीच्या तुलनेत महाविकास आघाडीचा प्रचार अधिक जोमाने सुरू असल्याचे स्पष्ट होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे उर्वरित टप्पे पुन्हा वेळापत्रकबद्ध करण्यात आले आहेत. आता ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होईल. मतमोजणी ७ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होईल. महाराष्ट्र निवडणूक आयोगाने १३ जानेवारी २०२६ रोजी या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी निवडणूक वेळापत्रक जाहीर केले.
निवडणूक वेळापत्रकानुसार, नामांकन पत्रे दाखल करणे, अर्ज मागे घेणे, चिन्हांचे वाटप करणे आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करणे ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुढील टप्प्यांमध्ये मतदान, मतमोजणी आणि राजपत्रात निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करणे समाविष्ट आहे.






