शिवसेना किशोरी पेडणेकर यांनी महेश कोठारे यांच्या मोदीभक्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली (फोटो - सोशल मीडिया)
Mahesh Kothare Modibhakta: मुंबई : केंद्रात तिसरी टर्म सरकार चालवणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहता वर्ग मोठा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील नरेंद्र मोदी यांची लोकप्रिय नेते म्हणून ओळख आहे. त्याचबरोबर देशामध्ये देखील अनेक नामांकित व्यक्ती, बिझनेसमॅन आणि कलाकार हे मोदी सरकारचे चाहते आहेत. असेच मराठी चित्रपटसृष्टी अभिनेते आणि निर्माते महेश कोठारे यांनी देखील आपली आवड व्यक्त केली. एका कार्यक्रमामध्ये त्यांनी थेट मी मोदीभक्त असल्याचे जाहीर केले. यावरुन आता उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. महेश कोठारे यांच्या वक्तव्याव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, महेश कोठारे हे कलाकार आहे, ही खरी गोष्ट आहे. पण त्यांच्या सुनबाई अडकल्यात एका अपघात प्रकरणात. तिला कसं वाचवायचं? हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. भाजपावर अशी मुक्ताफळे उधळल्याशिवाय ही गोष्ट साध्य होणार नाही. महाराष्ट्रात जी एक संस्कृती तयार होतोय, मी नाव नाही घेणार, मला कुठल्याही जातीचा अपमान नाही करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या संस्कृतीने संपूर्ण महाराष्ट्रावर शौर्य दाखवलं, पण त्यासोबत क्रौर्यही दाखवलं, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता महेश कोठारे आणि भाजपचे नेते काही प्रतिक्रिया देणार का? हे पाहणंही महत्त्वाचं असेल.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले महेश कोठारे?
दिवाळी पहाट २०२५ च्या कार्यक्रमांमध्ये महेश कोठारे यांनी मी मोदीजींचा भक्त आहे असे म्हटले. तसंच त्यांनी पुढे असंही म्हटलं की भाजप हे आपलं घर आहे. कारण मी भाजपाचा भक्त आहे, मी मोदीजीं चा भक्त आहे, मुंबईत नक्कीच कमळ फुलेल… निवडणुकीदरम्यान सुद्धा महेश कोठारे यांनी भाजपच्या वतीने समर्थन दर्शवले होते. यावेळी कार्यक्रमात ते म्हणाले की जेव्हा मी पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो तेव्हा मी म्हटलं होतं की ते खासदार निवडून देत नाहीत तर मंत्री निवडून देत आहे. आता या विभागातून नगरसेवक नाही तर महापौर निवडला जाईल असे त्यांनी म्हटले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उर्मिला कोठारे गाडी अपघात प्रकरण
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कारचा भीषण अपघात झाला होता. ठाणे-घोडबंदर रस्त्यावर मध्यरात्री १२.५५ च्या सुमारास हा अपघात झाला होता. त्यावेळी उर्मिला कोठारे ही आपल्या मैत्रिणीला भेटून तिच्या घरी जात होती. यावेळी तिचा चालक गजानन पाल हा कार चालवत होता. कांदिवली पोईसर मेट्रो स्थानकाजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी उलटली. या अनियंत्रित कारने मेट्रो स्थानकाजवळ काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवले. त्यानंतर कार बेरिकेटला जाऊन धडकली होती. या अपघातामध्ये सम्राटदास जितेंद्र या मजुराचा मृत्यू झाला होता. तर उर्मिला कोठारे ही अपघातात जखमी झाली होती. तिलाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अपघाताच्यावेळी चालक गजानन पाल गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली होती. तो गाडी चालवताना दारुच्या नशेत होता का, हे तपासण्यासाठी पोलिसांनी त्याच्या रक्ताचे नमुनेही घेतले होते. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरु आहे.