छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 पैकी 11 जागांवर महिलांनी मारली बाजी; भाजपची ताकद वाढली (फोटो - सोशल मीडिया)
कन्नड / सुरेश चव्हाण : तालुक्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक निकालाने आगामी काळात राजकीय बदलाचे संकेत दिलेले आहेत. जिल्हा परिषदेच्या आठ जागांपैकी भाजपने तीन जागा जिंकून आपला गड शाबूत ठेवला आहे. ठाकरे गटाने दोन जागा जिंकल्या. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना केवळ एका जागेवर विजय मिळविता आला. तर सोळापैकी दहा जागा जिंकून भाजपने पंचायत समितीमध्ये सत्ता काबीज केली आहे.
भाजपने जिल्हा परिषदेसाठी ६ जागा लढविल्या. त्यापैकी ३ जागा जिंकल्या. निवडणुकीत ६ जागांसाठी पक्षाने झालेल्या मतदानापैकी क्रमांक १ ची म्हणजे ३७ हजार १३४ मते मिळविली. तर पंचायत समितीच्या १६ जागांपैकी १० जागांवर कमळ निशाणीवर लढलेल्या १० जागांपैकी ४ जागावर भाजपला यश मिळाले. तर झालेल्या मतदानापैकी पक्षाने ३३ हजार १२६ मते मिळविली. ६ जागा लढविलेल्या शिवसेनेला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. यात झालेल्या मतदानापकी पक्षाला क्र.२ ची म्हणजे ३३ हजार १२६ मते मिळाली. मात्र, शिवसेनेने पंचायत समितीच्या १३ जागा लढवून ८ जागा जिंकताना ४२ हजार ५९७ मते मिळविली.
शिवसेना पक्षाचा आमदार असताना जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला मिळालेले अपयश चिंताजनक असले तरी पंचायत समितीची निवडणुकीत अपयश भरून निघाले आहे. मात्र, भाजपने मिळवलेले मतदान शिवसेनेसाठी चिंता वाढवणारा आहे. पंचायत समितीच्या १६ जागांपैकी ८ जागा महिलांसाठी राखीव असताना ११ जागांवर महिला विजयी झाल्या आहेत. शिवसेना ८, भाजप ४, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), काँग्रेस, उबाठा आणि रायभान जाधव विकास आघाडी यांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झालेला आहे. त्यामुळे सभापती शिवसेनेचाच होणार हे नक्की आहे.
बहुमतासाठी शिवसेनेला एका मताची आवश्यकता
बहुमतासाठी शिवसेनेला एका मताची आवश्यकता आहे. निवडणुकीत युती करूनही भाजपने ऐनवेळी धोका दिल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. मग आता पंचायत समितीच्या सभापती-उपसभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेना भाजपला बरोबर घेणार की राष्ट्रवादीची साथ घेऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार हे लवकरच दिसेल. शिवसेनेकडून सभापती पदावर कुणाची वर्णी लागेल याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तविण्यात येत आहेत.
सर्वसाधारण तीन जागांवर विजय
पंचायत समितीच्या १६ जागांपैकी ८ जागा महिलांसाठी राखीव असतांना ११ जागांवर महिला विजयी झाल्या आहेत. सर्वसाधारण जागांवर ३ महिलांनी यश मिळविले आहे. परिणामी, सभागृहात महिला सदस्यांची संख्या जास्त राहणार असून, खऱ्या अर्थाने महिलाराज सुरू होणार आहे.
हेदेखील वाचा : Supriya Sule : भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार; खासदार सुप्रिया सुळेंनी थेट जोडले हात






