गोष्ट अशी की, एकदा बडोद्याचे मल्हारराव गायकवाड हे एक प्रतिष्ठीत नाव होतं. स्वामींच्या लिला आणि स्वामी भक्तांना देत असलेले मार्गदर्शन यामुळे अक्कलकोटाची ख्याती सर्वदूर परसली. हे स्वामी कोणी साधे पुरुष नक्कीच नाही. यांच्यात दैवीशक्ती आहे हे मल्हाररावांनी ओळखलं होतं. एकदा मल्हारराव दरबारात आपल्या सरदारांसह बसले होते. त्यावेळी मल्हाररावांनी सांगितलं की, जो कोणी स्वामी समर्थांना बडोद्यात घेऊन येईल त्यास आम्ही जहागीरदारी देऊ. हे ऐकून तात्यासाहेबांनी मी आणतो म्हणून विडा उचलला. मल्हाररावांना मोठा आनंद झाला. तात्यासाहेबांना त्यांनी पुष्कळ द्रव्य देऊन अक्कलकोटात पाठवलं. त्यावेळी तात्यासाहेबांनी चोळप्पा महाराजांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. तात्यासाहेब चोळप्पा महाराजांस म्हणाले कसंही करुन स्वामींना बडोद्याला घेऊन चलाल मी तुम्हाला दहा हजारांची जहागिरदारी देतो मल्हाररावांकडून. चोळप्पा महाराज तयार झाले. आधी चोळप्पा मग सुंदराबाई आणि बाळप्पा महाराज असं प्रत्येकाला तात्यारावांनी आमीष दिलं होेतं जेणकरुन स्वामी महाराज बडोद्यास येतील.
श्री स्वामी समर्थ म्हणजे साक्षाक दत्तांचा अवतार. ते मनुष्य रुपात असले तरी त्यांच्याकडे दैवीशक्ती होती. सगळ्यांनी महाराजांना बडोद्याला जायचा आग्रह केला. त्यानंतर स्वामींनी ते मान्य केलं आणि मेण्यातून स्वामी निघाले. वाटेतच मेणा नेणाऱ्यांना तो हलका वाटला पाहतात तर काय स्वामी मेण्यात नव्हते. एका गावच्या आडवाटेला ते बसले होते. सगळी शोधाशोध सुरु झाली कोणाला काहीच कळेना स्वामी गेले तरी कुठे. त्यानंतर स्वामी रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडावर बसले होते. स्वामी म्हणाले की, बडोद्यास मला घेऊन जाण्याचं कारण काय ? अरे मल्हाररावांकडे संपत्ती आहे श्रद्धा आणि भक्ती नाही. मग मी कसा जाणार तिकडे. स्वामींच्या या प्रश्नाने प्रत्येकाचे डोळे उघडले. चोळप्पा महाराज, बाळप्पा आणि सुंदराबाई यांनी स्वामींची माफी मागितली. म्हणाले आम्हाला संपत्तीचा मोह आम्हाला क्षमा करा स्वामी आम्ही चुकलो. या प्रसंगातून स्वामींनी हेच सांगितलं की, संपत्ती आणि पैशाने देव आपला होत नाही त्यासाठी मनातून समर्पण आणि श्रद्धा असावी लागते.
सदर लेख स्वामी समर्थांच्या बखरवर आधारित आहे.






