महाराष्ट्रात ज्या उत्साहात गुढीपाडवा साजरा केला जातो, त्याच दिवशी दक्षिण भारतातलदेखील नववर्षाची सुरुवात होते. जसं मराठी बांधव गुढीपाडवा म्हणतात तेच दाक्षिणात्य भागात याला उगादी असं म्हटलं जातं. उगादी हा सण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. हा शब्द संस्कृतमधील ‘युग + आदि’ या पासून तयार झाला. या शब्दाचा अर्थ नवीन युगाची सुरुवात असा आहे.
उगादी कशी साजरी करतात?
उगादीच्या दिवशी दाक्षिणात्य बांधव पहाटे लवकर उठतात, घराची स्वच्छता करतात आणि आंघोळीनंतर नवीन कपडे घालतात. घराच्या दाराला आंब्याच्या पानांचे तोरण लावलं जातं. पारंपरिक पद्धतीने घरं सजवली जातात. तसंच घरासमोर सुंदर रांगोळी काढून या उगादी सणाचं स्वागत केलं जातं.
उगादी पचडीची खास परंपरा
या दिवशी ‘उगादी पचडी’ नावाचा एक खास पदार्थ बनवला जातो. यात कडू, गोड, आंबट, तिखट, खारट आणि तुरट असे सहा चवी असतात. असं म्हटलं जातं की, या सहा चवी आयुष्यातील सुख-दुःख, राग, आनंद, आशा आणि संघर्ष यांचे प्रतीक मानल्या जातात. जीवनात सर्व अनुभव स्वीकारण्याचा संदेश या परंपरेतून दिला जातो.
पंचांग श्रवण
उगादीच्या दिवशी पुजारी किंवा ज्योतिषी नव्या वर्षाचे पंचांग वाचून दाखवतात. याला ‘पंचांग श्रवण’ म्हणतात. नव्या वर्षात काय घडू शकते याबद्दल लोक श्रद्धेने ऐकतात.
गुढीपाडवा आणि उगादी
महाराष्ट्रात गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते, तर दक्षिण भारतात उगादी पचडी आणि पूजा करून नवीन वर्ष साजरं केलं जातं. नाव वेगळं असलं तरी नवीन वर्षाचं स्वागत, आनंद आणि सकारात्मकतेचा संदेश दोन्ही सणांमध्ये सारखाच आहे.म्हणूनच, महाराष्ट्रातला गुढीपाडवा असो किंवा दक्षिणेतील उगादी, भारतीय संस्कृतीतील नव्या सुरुवातीचा आनंद दोन्हीकडे सारख्याच उत्साहात साजरा केला जातो.






