फोटो सौजन्य- pinterest
भारतीय अध्यात्मपरंपरेत काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत की ज्यांनी केवळ धर्माची व्याख्या बदलली नाही, तर समाजाच्या विचारसरणीलाही नवे वळण दिले. अशा तेजस्वी संतांमध्ये रामानुजाचार्य (Ramanujacharya) यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांच्या जीवनकार्याचा विचार केला, तर ते केवळ एक तत्त्वज्ञ नव्हते, तर ते सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी शिल्पकार होते.
११व्या शतकात जन्मलेल्या रामानुजाचार्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाला “विशिष्टाद्वैत” या संकल्पनेची देणगी दिली. विशिष्टाद्वैत ही त्यांची प्रमुख विचारधारा होती, ज्यामध्ये त्यांनी अद्वैत आणि द्वैत यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते, परमेश्वर, जीव आणि प्रकृती यांच्यातील नाते हे वेगळे असूनही एकमेकांशी निगडीत आहे. ही भूमिका केवळ तत्त्वज्ञानापुरती मर्यादित न राहता, ती समाजातील समतेच्या विचाराशी जोडली गेली.
रामानुजाचार्यांच्या कार्याचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांनी धर्माला सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणले. त्या काळात वेदाधिकार केवळ उच्चवर्णीयांपुरता मर्यादित होता. मात्र, रामानुजाचार्यांनी या परंपरेला छेद देत सर्व जातीधर्मातील लोकांना भक्तीचा आणि मोक्षाचा अधिकार दिला. त्यांनी “ॐ नमो नारायणाय” हा मंत्र सर्वांसाठी खुला केला. हा निर्णय त्या काळात क्रांतिकारी ठरला. खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीचे पहिले पाऊल होते.
त्यांच्या विचारांचा प्रभाव श्रीमद्भगवद्गीता आणि उपनिषदे यावरील त्यांच्या भाष्यांतून स्पष्ट दिसून येतो. त्यांनी या ग्रंथांचे सोपे, सुसंगत आणि सर्वसमावेशक अर्थ लावले, ज्यामुळे सामान्य माणसालाही अध्यात्म समजणे शक्य झाले. त्यांच्या लेखनातून भक्तीमार्गाला नवे बळ मिळाले.
समाजसुधारणेच्या क्षेत्रातही रामानुजाचार्यांनी मोठे योगदान दिले. त्यांनी मंदिरांमध्ये सर्व समाजघटकांना प्रवेश मिळावा, यासाठी प्रयत्न केले. श्रीरंग मंदिरांमध्ये त्यांनी समानतेचा विचार रुजवला. मेलकोटे (कर्नाटक) येथील तिरुनायराणपूरम (श्री चेलुवनारायण स्वामी) मंदिरात अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजातील लोकांना प्रवेश मिळवून दिला होता. त्यांच्या कार्यामुळे धर्म हा केवळ विधीपुरता न राहता, तो समाजकल्याणाशी निगडीत झाला.
आजच्या काळात रामानुजाचार्यांचे विचार अधिकच महत्त्वाचे वाटतात. जातीभेद, विषमता आणि धार्मिक संकुचितता यांसारख्या समस्या अजूनही समाजात अस्तित्वात आहेत. अशा वेळी त्यांच्या समतेच्या आणि भक्तीच्या तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेणे अत्यावश्यक आहे.
रामानुजाचार्य हे केवळ इतिहासातील एक अध्याय नाहीत, तर ते आजही जिवंत असलेले विचार आहेत. समतेचे, सहिष्णुतेचे आणि मानवतेचे. त्यांच्या जीवनकार्याकडे पाहताना, आपण केवळ त्यांचे स्मरण न करता, त्यांच्या विचारांना आचरणात आणणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.
हैदराबादजवळील मुचिंतल येथे स्थित संत रामानुजाचार्य यांचा २१६ फूट उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ (Statue of Equality) म्हणून ओळखला जातो. ११ व्या शतकातील समाजसुधारक रामानुजाचार्य यांच्या १,००० व्या जयंतीनिमित्त उभारलेला हा पुतळा पंचलोहा (पाच धातू) पासून बनलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच आसनस्थ धातूचा पुतळा आहे
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: रामानुजाचार्य हे ११व्या शतकातील महान संत, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्मात समता आणि भक्तीचा संदेश दिला.
Ans: विशिष्टाद्वैत हे रामानुजाचार्यांचे तत्त्वज्ञान आहे, ज्यामध्ये परमेश्वर, जीव आणि प्रकृती यांचे वेगळेपण असूनही एकमेकांशी संबंध असल्याचे सांगितले आहे.
Ans: हा मंत्र त्यांनी सर्वांसाठी खुला केला, ज्यामुळे प्रत्येकाला ईश्वराशी थेट नाते जोडण्याची संधी मिळाली.






