National Science Day 2026 : ग्रामीण मुलींच्या पंखांना संशोधनाचे बळ; असा घडतोय 'विकसित भारत' (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
सुनयना सोनवणे : देशात आज राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जात आहे. आजचा हा दिवस, भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रमन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी लावलेल्या रमन परिणामाच्या शोधाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. या संशोधनासाठी त्यांना १९३० साली भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९८६ मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय विज्ञान दिन जाहीर केला होता आणि १९८७ पासून तो देशभर साजरा केला जाऊ लागला.
यंदा हा दिवस ‘विज्ञानातील महिला’ : ‘उत्प्रेरक विकसित भारत’ या संकल्पनेखाली साजरा होत आहे. याच निमित्ताने एक प्रश्न नव्याने समोर येतो तो म्हणजे विकसित भारताच्या स्वप्नात ग्रामीण भागातील मुलींची भूमिका किती महत्त्वाची आहे? शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात विज्ञान शिक्षणाच्या संधी अजूनही मर्यादित आहेत. प्रयोगशाळांची कमतरता, आर्थिक अडचणी, सामाजिक बंधने आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव या सगळ्यांमुळे अनेक प्रतिभावान मुलींची स्वप्ने अर्ध्यावर थांबतात. तरीही बदलाची चाहूल लागली आहे.
विकसित भारताच्या उभारणीत महिला शास्त्रज्ञांचे योगदान, नेतृत्व आणि नवोन्मेषी भूमिका अधोरेखित करणे हा यंदाच्या थीमचा केंद्रबिंदू आहे. संशोधन, अवकाश तंत्रज्ञान, वैद्यकीय विज्ञान, जैवतंत्रज्ञान, पर्यावरण अभ्यास, डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रांत भारतीय महिलांनी भक्कम ठसा उमटविला आहे. तज्ज्ञांच्या मते, विज्ञान क्षेत्रातील महिलांचा व्यापक आणि सक्षम सहभाग हीच काळाची गरज आहे.
ग्रामीण विकास अभ्यासक प्रा.अनिल पाटील सांगतात, ‘विज्ञानातील महिलांचा सहभाग वाढविल्याशिवाय विकसित भारताची उभारणी शक्य नाही. कृषी तंत्रज्ञान, जलव्यवस्थापन, आरोग्य सेवा, अक्षय ऊर्जा या क्षेत्रांत ग्रामीण पार्श्वभूमीच्या महिला शास्त्रज्ञांचे योगदान अत्यंत उपयुक्त ठरू शकते. गावातील मुली विज्ञान शिकल्या, तर त्या स्थानिक समस्यांवर स्थानिक उपाय शोधू शकतात.’
मराठवाड्यातील एका छोट्याशा खेड्यात वाढलेली पूजा सोनसाळे सध्या सूक्ष्मजीवशास्त्रात पीएच.डी. करत आहे. तिचे संशोधन ग्रामीण भागातील पाणीशुद्धीकरणासाठी सूक्ष्मजीवांचा वापर यावर आधारित आहे. ती सांगते, ‘लहानपणी आमच्या गावात टँकरने येणाऱ्या अशुद्ध पाण्यामुळे रोगराई वाढायची. त्या अनुभवातूनच मला संशोधनाची दिशा मिळाली. विज्ञान हे केवळ पदवी मिळवण्याचे साधन नसून ते समस्यांचे उत्तर आहे.’ पूजासारख्या संशोधक मुली ग्रामीण वास्तवातूनच संशोधनाची बीजे घेतात आणि त्यातूनच विकसित भारताची नवी दिशा तयार होत आहे.
केंद्र सरकारच्या ‘उमेद’ योजनेतून ‘नमो ड्रोन दिदी’ उपक्रमासाठी अर्ज करून पुणे जिल्ह्यातील पहिल्या महिला ड्रोन पायलट बनलेल्या नीलम दिवेकर यांची कहाणीही प्रेरणादायी आहे. त्या सांगतात, ‘पूर्वी आम्ही पारंपरिक शेती करत होतो. आता ड्रोनमुळे वेळ, खर्च आणि मजुरी वाचते. गावातील मुलींनाही तंत्रज्ञान शिकण्याची प्रेरणा मिळते. ड्रोनच्या माध्यमातून कीडनाशक फवारणी, पिकांचे निरीक्षण आणि मातीचे विश्लेषण ही कामे आज सहज होत आहेत. विज्ञान हे केवळ पुस्तकापुरते नसून प्रत्यक्ष आयुष्यात कसे उतरते याचे हे जिवंत उदाहरण आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींमध्ये प्रयोगाधारित शिक्षण रुजवण्यासाठी प्रयत्नशील असलेले माध्यमिक शिक्षक अनिल कुटवाड सांगतात, ‘ग्रामीण शाळांमध्ये प्रयोगशाळा मर्यादित असल्या तरी मुलींची जिज्ञासा अमर्याद असते. त्यांना योग्य दिशा आणि संधी मिळाली तर त्या कमाल करू शकतात.
यावर्षीची थीम केवळ घोषवाक्य न राहता कृतीत उतरली पाहिजे. गावातील मुली विज्ञानात पुढे आल्या, तर विकसित भारताचा पाया खऱ्या अर्थाने मजबूत होईल. विज्ञान हे त्यांच्यासाठी पर्याय नाही, तर परिवर्तनाची ताकद आहे.’ विशेष म्हणजे, सलग बारा वेळा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि त्यात मुलींची संख्या नेहमीच अधिक राहिली आहे.






