World Wetlands Day 2026 : निसर्ग संवर्धनामध्ये पाणथळ जागांचे किती महत्त्व? महाराष्ट्रात कुठे येईल बघता? (फोटो सौजन्य: iStock)
सुनयना सोनवणे : दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिन म्हणूना साजरा केला जातो. १९७१ मध्ये रामसर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराराच्या स्मरणार्थ पाळला जाणारा हा दिवस पाणथळ परिसंस्थांचे पर्यावरणीय, आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करतो. “पाणथळ जागा आणि पारंपारिक ज्ञान: सांस्कृतिक वारसा साजरा करणे” ही या वर्षीची थीम आहे. पाणथळ जागा आणि लोकांमधील संबंधांवर प्रकाश टाकणारी ही थीम आहे. विशेष म्हणजे, पिढ्यान्पिढ्या चालत आलेले स्थानिक ज्ञान या परिसंस्थांच्या संरक्षणात आजही तितकेच उपयुक्त ठरत आहे.
कायमस्वरूपी किंवा हंगामी पाण्याने व्यापलेला असा भूभाग, जिथे जलीय वनस्पतींचे प्राबल्य असते. ही क्षेत्रे जैवविविधतेचे आश्रयस्थान मानली जातात. पक्षी, मासे, उभयचर आणि अनेक दुर्मिळ वनस्पतींसाठी ती सुरक्षित अधिवास निर्माण करतात. हिवाळ्यात परदेशातून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी तर ही ठिकाणे जीवनरेखा ठरतात.
महाराष्ट्रात नांदूर मध्यमेश्वर, लोणार सरोवर आणि ठाणे खाडी ही तीन प्रमुख रामसर पाणथळ स्थळे आहेत. नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर ‘महाराष्ट्राचे भरतपूर’ म्हणून ओळखले जाते. गोदावरी नदीच्या पात्रात वसलेले हे राज्यातील पहिले रामसर स्थळ असून येथे फ्लेमिंगोसह अनेक पक्ष्यांचे निवास आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर उल्कापातामुळे तयार झालेले खाऱ्या पाण्याचे अद्वितीय विवर सरोवर आहे, तर मुंबईतील ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यामुळे पक्षीनिरीक्षकांचे आकर्षण ठरले आहे.
राज्यभरात उजनी धरण, कोकणातील खारफुटी क्षेत्रे आणि पांजे-डोंगरीसारख्या जागांसह अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित पाणथळे आढळतात. पारंपारिक पद्धतीने मासेमारी, जलसंधारण आणि संसाधनांचा मर्यादित वापर यामुळे स्थानिक समुदायांनी या परिसंस्थांचा समतोल दीर्घकाळ राखला. त्यामुळे पाणथळे ही केवळ पर्यावरणीय नव्हे तर सांस्कृतिक ओळखीचा भाग असल्याचे स्पष्ट होते.
पाणथळांचे महत्त्व पर्यावरणापुरते मर्यादित नाही. ही क्षेत्रे नैसर्गिक जलशुद्धीकरण करतात, पूर नियंत्रणास मदत करतात आणि भूजल पुनर्भरणाला चालना देतात. मत्स्यव्यवसाय, इको-टुरिझम आणि स्थानिक व्यवसायांमुळे रोजगारनिर्मिती होते, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होते. आधुनिक विज्ञान आणि पारंपारिक ज्ञान यांचा संगम साधण्याची आज गरज आहे. स्थानिक समुदायांचा सहभाग, शाश्वत वापर आणि जनजागृती यांद्वारेच या नैसर्गिक वारशाचे संरक्षण शक्य आहे.
पश्चिम बंगालमधील सुंदरबन हे भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ तर हिमाचल प्रदेशातील रेणुका वेटलँड सर्वात लहान आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत देशातील रामसर स्थळांची संख्या ९६ वर पोहोचली आहे. तथापि, शहरीकरण, अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे अनेक पाणथळ क्षेत्रांवर संकट निर्माण झाले आहे. याची दखल घेत महाराष्ट्रात पाणथळ जमिनी नष्ट करण्यावर उच्च न्यायालयाने बंदी घातली असून ‘पाणथळ तक्रार निवारण समिती’ स्थापन करण्यात आली आहे. राज्य सरकार पाणथळ जागांचे नकाशे तयार करून नियमन करत आहे.
अखेर गुपित उलगडलं! ११.५ अब्ज वर्षांपूर्वीच्या अद्भुत आकाशगंगेचा लागला शोध, वैज्ञानिकही चक्रावले






