(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
लोकप्रिय मालिका ‘तारिणी’मध्ये प्रेक्षकांना लवकरच एक वेगळे आणि रंजक वळण पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या कथानकात पुढील भागात एक खास ट्विस्ट येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.याच पार्श्वभूमीवर, कौशिकीच्या MNN न्यूज चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या ‘थेट भेट’ या चर्चात्मक कार्यक्रमात एक खास मुलाखतीचा थरार रंगणार आहे. ‘थेट भेट’मध्ये राजकारणी, सिनेस्टार आणि प्रसिद्ध व्यक्तींशी थेट मुलाखत घेतली जाते.
या खास भागात ‘तारिणी’ मालिकेतील काही महत्त्वाच्या पात्रांची आणि कथानकाशी संबंधित व्यक्तींची थेट मुलाखत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या एपिसोडमुळे मालिकेतील वळण आणखी रोमांचक आणि चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
याच कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री बापुराव जामखंडी यांची खास मुलाखत घेण्यात येणार आहे. ही मुलाखत नेहमीप्रमाणे कौशिकी घेणार हे निश्चित होत, पण कामाचा जास्त ताणामुळे ती अचानक बेशुद्ध पडते. त्यामुळे सेटवर एकच गोंधळ उडतो, आता ही महत्त्वाची मुलाखत कोण घेणार, असा प्रश्न सगळ्यांसमोर उभा आहे. याच वेळी दयानंद सुचवतात की ही मुलाखत केदारने घ्यावी.
आता केदार एका पत्रकाराप्रमाणे मंत्री महोदयांची सर्व माहिती गोळा करतोय. मुलाखतीदरम्यान केदार एक सर्वसामान्य माणूस म्हणून त्यांना प्रश्न विचारतो. तो बापुराव जामखंडी यांच्या आयुष्याचा, संघर्षाचा आणि राजकीय प्रवासाचा सखोल आढावा घेतो. या मुलाखतीसाठी केदारला कौशिकीचा नवरा शेखर मदत करतो. ही मुलाखत प्रेक्षकांना खूप भावते आणि सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात व्हायरल ही होते.
कॅबिनेट मंत्री बापुराव जामखंडी यांची भूमिका ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग साकारणार आहेत. त्यांची व्यक्तिरेखा थेट, स्पष्टवक्ती आणि प्रभावी आहे. जे मनात आहे ते तोंडावर बोलणारा नेता म्हणून ते प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. पुढील भागांमध्ये या पात्राचा तारिणीच्या आईशी असलेला एक महत्त्वाचा संबंधही उलगडणार आहे, ज्यामुळे कथेला आणखी वेगळं वळण मिळणार आहे.






