जसप्रीत बुमराह(फोटो-सोशल मिडिया)
MI vs LSG : आयपीएल २०२५ च्या ४५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने होते. या सामन्यात मुंबईने एलएसजीचा पराभव केला आहे. लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. एलएसजीचा हा निर्णय त्यांच्याच अंगलट आलेला दिसून आला. कारण, प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ७ गडी गमावून २१५ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात लखनौ संघ १६१ धावाच करू शकला. या सामन्यात जसप्रीत बुमराहने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ४ बळी घेत संघाचे कंबरडे मोडून काढले होते. या सामन्यात त्याने मुंबईसाठी एक विशेष कामगिरी केली आहे. तो मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे.
वेगवान गोलंदाज जजसप्रीत बुमराहने लखनौविरुद्ध ४ बळी घेत ही कामगिरी करून दाखवली आहे. एडेन मार्करामला बाद करताच बुमराहने आपला १७१ वा बळी पूर्ण केला आणि यासह त्याने लसिथ मलिंगाचा विक्रम मोडून काढला. लसिथ मलिंगाने मुंबई इंडियन्ससाठी १७० बळी टिपले आहेत. मुंबई इंडियन्सकडून खेळाताना आयपीएलमध्ये त्याच्या दशकभराच्या कारकिर्दीत, मलिंगाने १२२ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने १७० फलंदाजांना बाद केले आहे. त्याच वेळी, स्टार गोलंदाज बुमराहने आता १३९ सामन्यांमध्ये १७४ बळी घेत मलिंगाचा विक्रम मोडीत काढला आहे. बूमराह मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक बळी घेणारा पहिला गोलंदाज बनला आहे.
आयपीएलमध्ये एखाद्या संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम सुनील नरेनच्या नावावर नोंदवला आहे. २०१२ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून, नरेनने कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताहे. त्याने कोलकात्यासाठी १८५ सामने खेळले आहेत आणि १८७ फलंदाजांना माघारी पाठवले आहे.






