भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये हरवणारा कर्णधार आता पाकिस्तानचा हेड कोच? (Photo Credit- X)
टी-२० विश्वचषकात पाकिस्तानचा संघ साखळी फेरीतच बाहेर पडल्याने चाहत्यांमध्ये आणि माजी क्रिकेटपटूंमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. संघाची रणनीती, खेळाडूंची निवड प्रक्रिया आणि कमकुवत कोचिंग सेटअपवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, कसोटी क्रिकेटमध्ये स्थैर्य आणण्यासाठी आणि संघाला नवी दिशा देण्यासाठी पीसीबी आता एका खंबीर नेतृत्वाच्या शोधात आहे. सरफराजची शिस्त आणि खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याची क्षमता लक्षात घेता, त्याच्या नावाचा गांभीर्याने विचार केला जात आहे.
माहितीनुसार, सरफराज अहमद नुकताच ‘पाकिस्तान शाहिन्स’ संघासोबत युएई दौऱ्यावर होता. तिथे इंग्लंड लायन्सविरुद्ध मालिका खेळवली जाणार होती, परंतु प्रादेशिक तणावामुळे इंग्लंडने हा दौरा स्थगित केला. असे असूनही, बोर्डाने सरफराज अहमदला मोठी जबाबदारी देण्याचे संकेत दिले आहेत. मे २०२६ मध्ये बांगलादेशविरुद्ध प्रस्तावित असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी सरफराज अहमद अधिकृतपणे पदभार स्वीकारू शकतो, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे.
सरफराज अहमदने गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानच्या १९ वर्षांखालील (Under-19) संघासोबत मार्गदर्शक (Mentor) म्हणून काम केले आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली डिसेंबर २०२५ मध्ये पाकिस्तानने आशिया चषक जिंकला, जिथे त्यांनी अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला होता. या यशामुळे सरफराज अहमदच्या रणनीतिक कौशल्याचे प्रचंड कौतुक झाले. पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी हे देखील सरफराज अहमदच्या कामावर समाधानी असून, त्यांनीच या बदलासाठी पुढाकार घेतल्याचे समजते.
सरफराज अहमद हा पाकिस्तानचा असा कर्णधार आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली संघाने २०१७ मध्ये भारताचा पराभव करून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते. प्रदीर्घ काळ संघाचे नेतृत्व करणाऱ्या सरफराज अहमदने ५४ कसोटी सामन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, खेळाडू म्हणून निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना थेट मुख्य प्रशिक्षक म्हणून कसोटी संघाची धुरा सांभाळणे, हे त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वात कठीण आव्हान मानले जात आहे.






