'भारतीय सैनिकांना काढून टाकणे हा चुकीचा निर्णय...' मालदीवचे माजी राष्ट्रपती नशीद यांनी का केले असे वक्तव्य? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
माले : मालदीवमधील माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी देशातून भारतीय सैन्य हटवण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून, हा निर्णय चुकीचा ठरल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय सैन्याची उपस्थिती मालदीवच्या सार्वभौमत्वासाठी कोणताही धोका निर्माण करत नाही, उलट देशाच्या सुरक्षेसाठी ती अत्यावश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
1988 मध्ये मालदीवमध्ये परकीय दहशतवाद्यांनी सत्तापालट करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन कॅक्टस’ अंतर्गत हा कट हाणून पाडला होता. याच घटनेचा संदर्भ देत नशीद यांनी सांगितले की, भविष्यात अशा प्रकारच्या हल्ल्यांचा धोका टाळण्यासाठी मालदीवमध्ये काही प्रमाणात भारतीय सैन्य उपस्थित राहणे आवश्यक आहे.
2023 च्या अखेरीस मोहम्मद मुइज्जू यांनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर भारतीय सैन्य हटवण्याचा निर्णय घेतला. मुइज्जू हे निवडणुकीत ‘इंडिया आउट’च्या घोषणेनिशी प्रचार करत होते, ज्यामुळे मालदीव आणि भारत यांच्यातील संबंध बिघडले. मात्र, आता दोन्ही देशांमधील संबंध सुधारत असल्याचे दिसत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इस्रायलच्या GPS हल्ल्यामुळे भारतीय विमानांसाठी धोका? पाकिस्तान सीमेवर 15 महिन्यांत 465 स्पूफिंग घटना
माजी राष्ट्रपती नशीद यांनी भारतीय सैन्याच्या उपस्थितीवर बोलताना सांगितले, “भारतीय सैन्याची उपस्थिती ही वाईट कल्पना नाही, कारण मालदीवच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करणे शक्य नाही.” मालदीव सरकारला हवामान संकट आणि अन्य आर्थिक समस्यांमुळे संरक्षणावर मोठा खर्च करणे कठीण जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.
नुकताच भारत दौऱ्यावर आलेल्या मोहम्मद नशीद यांनी चीनकडून घेतलेल्या प्रचंड कर्जावरही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “मालदीव अजूनही चीनला 2 अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडत आहे, आणि त्यामुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे.” चीनने अनेक लहान राष्ट्रांना कर्जाच्या जाळ्यात अडकवले आहे, याचे उदाहरण म्हणून श्रीलंकेचीही चर्चा होत असते. मालदीवसाठीही ही परिस्थिती चिंताजनक ठरू शकते. त्यामुळे भारतासोबत मजबूत संबंध राखणे देशाच्या हिताचे आहे, असे नशीद यांनी स्पष्ट केले.
मोहम्मद नशीद हे 2008 मध्ये मालदीवचे पहिले लोकशाही मार्गाने निवडून आलेले राष्ट्रपती होते. ते भारतासोबत अतिशय चांगले संबंध राखणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी “इंडिया फर्स्ट” धोरणाला पाठिंबा दिला आणि मालदीवच्या विकासात भारताच्या सहभागाचे कौतुक केले. त्यांनी आपल्या मुलाखतीत नमूद केले की, “भारतीय सैन्याने 1988 मध्ये मालदीवचा बचाव केला होता. जर तेव्हा भारतीय जवान मदतीला आले नसते, तर मालदीवचा इतिहास वेगळा असता. भविष्यातही अशा संकटांना तोंड देण्यासाठी भारताची मदत महत्त्वाची आहे.”
मालदीवमध्ये 2018 ते 2023 या काळात मोहम्मद नशीद यांच्या मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) ची सत्ता होती. या काळात भारत आणि मालदीवमध्ये घनिष्ठ संबंध होते, आणि ‘इंडिया फर्स्ट’ धोरण प्रभावीपणे राबवले जात होते. मात्र, 2023 मध्ये झालेल्या निवडणुकीत मोहम्मद मुइज्जू विजयी झाले आणि सत्तापालट झाला. मुइज्जू यांचा झुकाव चीनकडे अधिक असल्याचे मानले जाते, त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात भारत आणि मालदीवमधील संबंध तणावग्रस्त राहिले. मात्र, आता परिस्थिती हळूहळू सुधारत आहे, आणि दोन्ही देशांमध्ये समजूतदारपणा वाढल्याचे दिसत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताची नवी आर्थिक रणनीती, चीनसोबत करणार युती; अमेरिकेला मिळणार सडेतोड उत्तर
माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांचे वक्तव्य मालदीवच्या धोरणांवर मोठा प्रभाव टाकू शकते. भारतीय सैन्याची उपस्थिती ही मालदीवच्या सुरक्षेसाठी फायद्याची आहे, आणि चीनच्या कर्जाच्या जाळ्यात न अडकता भारतासोबत सहकार्य वाढवण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्यावर आता मोठ्या प्रमाणावर दबाव वाढला आहे – ते भारताशी संबंध अधिक बळकट करण्याच्या दिशेने पाऊल उचलणार का, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. भविष्यात भारत आणि मालदीवमधील संबंध अधिक दृढ होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.