भारतीय ‘Bofors’ रणांगण हादरवणार; स्वदेशी ATAGS तोफेच्या रूपात लष्कराला मिळाली नवी ताकद ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Advanced Towed Artillery Gun System (ATAGS) Features : भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक घटना घडली आहे. भारत पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर स्वदेशी विकसित Advanced Towed Artillery Gun System (ATAGS) तैनात करणार आहे. सुरक्षा मंत्रिमंडळाच्या समितीने ७००० कोटी रुपयांची मंजुरी दिली असून, एकूण ३०७ ATAGS तोफा भारतीय लष्करात समाविष्ट होणार आहेत. यामुळे भारताच्या तोफखान्याच्या शक्तीत मोठी वाढ होणार आहे आणि हे शत्रूंसाठी एक निर्णायक वज्रप्रहार ठरणार आहे.
ATAGS ही भारतात डिझाईन, विकसित आणि तयार करण्यात आलेली पहिली स्वदेशी तोफा आहे. 155mm आणि 52 कॅलिबर क्षमतेच्या या तोफेची वैशिष्ट्ये अतिशय अद्वितीय आहेत. ती ४८ किमी अंतरापर्यंत अचूक मारा करू शकते, हे जगातील कोणत्याही तोफेखान्यासाठी अप्रतिम मानले जाते. एका मिनिटात ५ शेल डागण्याची क्षमता असल्याने ती युद्धभूमीवर वेगाने आणि अचूकतेने कार्यरत राहू शकते.
याशिवाय, ATAGS ही -३५°C ते ७५°C पर्यंत कोणत्याही हवामानात कार्यरत राहू शकते, त्यामुळे ती सियाचीनसारख्या थंड भागांपासून राजस्थानच्या उष्ण वाळवंटातही सहज तैनात करता येईल. यामुळेच ATAGS ला ‘स्वदेशी बोफोर्स’ म्हणून ओळखले जात आहे, कारण ती पूर्वीच्या बोफोर्स तोफेसारखीच उच्च दर्जाची कार्यक्षमता प्रदान करते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘NATO’ अमेरिकेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत, थांबवणार ‘ही’ मोठी डील, जाणून घ्या का?
ही तोफा संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), महिंद्रा डिफेन्स, भारत फोर्ज लिमिटेड, टाटा पॉवर स्ट्रॅटेजिक डिव्हिजन आणि ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड यांच्या सहकार्याने पूर्णपणे भारतात विकसित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या तोफेतील ६५% पेक्षा अधिक भाग स्वदेशी आहेत, जे भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी मानली जाते.
ATAGSमध्ये नेव्हिगेशन सिस्टीम, अत्याधुनिक सेन्सर्स, मिसाईल व्हेलॉसिटी रडार आणि ऑटोमॅटिक फायरिंग यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे ही तोफा स्मार्ट तंत्रज्ञानाने युक्त असून, डिजिटल कम्युनिकेशनद्वारे अत्यंत अचूकतेने लक्ष्यभेदन करू शकते.
ATAGSच्या तैनातीमुळे भारताला मोठा फायदा होईल. आतापर्यंत लष्कराला तोफा आणि तोफखान्यासाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, ATAGSमुळे हे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि देशातील संरक्षण क्षेत्र मजबूत होईल.
भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ धोरणांतर्गत ATAGS हा एक मोठा यशस्वी टप्पा आहे. तसेच, भविष्यात भारत अन्य देशांना या तोफा निर्यात करण्याच्या दिशेनेही वाटचाल करू शकतो.
ATAGSच्या विकासाची प्रक्रिया २०१३ मध्ये सुरू झाली होती. १४ जुलै २०१६ रोजी या तोफेची पहिली यशस्वी चाचणी झाली, तर २०१७ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातही तिचा समावेश करण्यात आला. जून २०२१ मध्ये १५,००० फूट उंचीवर यशस्वी चाचणी पार पडली. आता ही तोफा पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर तैनात केली जाणार आहे.
DRDOच्या शास्त्रज्ञांचा दावा आहे की ATAGS ही जगातील सर्वोत्तम तोफ आहे. इतकेच नाही, तर इस्रायलसारख्या देशांकडेही अशी प्रगत तोफखाना प्रणाली नाही. चीन आणि पाकिस्तानसह अन्य कोणत्याही देशाने ४८ किमीपर्यंत मारा करू शकणारी तोफा विकसित केलेली नाही. त्यामुळे ATAGS युद्धभूमीवर मोठा फरक निर्माण करू शकते आणि भारतीय लष्कराला जबरदस्त सामर्थ्य प्रदान करू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 118 कोटींना विकली गेलेली एम. एफ. हुसेन यांची पेंटिंग; जाणून घ्या काय आहे खास?
भारताचे लष्कर सुपर पॉवर होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. ATAGSच्या समावेशामुळे भारतीय तोफखान्याची ताकद प्रचंड वाढणार असून, सीमेवर तैनात सैनिकांना आणखी प्रभावी शस्त्र उपलब्ध होईल. आता भारत केवळ संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होत नाही, तर जागतिक पातळीवरही आपली ताकद दाखवत आहे. ATAGS निश्चितच एक ‘गेम चेंजर’ ठरणार असून, हे स्वदेशी ‘बोफोर्स’ रणांगणावर भारतीय विजयाची नांदी ठरू शकतात!