'रक्ताची शपथ आणि बलिदान...' भारताकडून पराभूत होण्यास उत्सुक शाहबाज शरीफ, पहलगामवर पहिले विधान केले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने थेट पाकिस्तानला जबाबदार धरत बदला घेण्याची शपथ घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपल्या देशाच्या सैन्याला उद्देशून कठोर भाष्य केले आहे. भारताच्या आरोपांना फेटाळून लावत त्यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तान नेहमीच दहशतवादाचा निषेध करतो आणि त्याविरुद्ध लढताना असंख्य बलिदान दिले आहेत.
शाहबाज शरीफ म्हणाले की, “पहलगाममध्ये जे काही घडले, ते केवळ आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण आहे. आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.” त्यांनी कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय चौकशीसाठी पाकिस्तान तयार असल्याचेही नमूद केले. पाकिस्तानने दहशतवादाविरुद्ध नेहमी कठोर भूमिका घेतली असून, जागतिक समुदायासमोरही त्याने आपल्या भूमिकेचे समर्थन केले असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, त्यांनी आपल्या भाषणात जोरदार इशारा दिला की, पाकिस्तानचे सैन्य युद्धासाठी पूर्णपणे सज्ज आहे आणि कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास सक्षम आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-Pakistan: ‘सिंधूमध्ये एकतर पाणी वाहील नाहीतर त्यांचे रक्त…’ पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टोंनी भारतविरोधात गरळ ओकली
शाहबाज शरीफ यांनी आपल्या भाषणात देशभक्तीचा सूर आळवत सांगितले की, “आम्ही पाकिस्तानच्या प्रत्येक इंच जमिनीचे रक्षण करू. शांतता आमच्यासाठी प्रथम आहे, मात्र कोणीही ती आमची कमजोरी समजू नये.” त्यांनी सैन्याच्या क्षमतेवर भर देत सांगितले की, कोणतीही आग्रही भूमिका किंवा आक्रमण सहन केले जाणार नाही. त्यांनी देशवासीयांना आश्वस्त केले की, “पाकिस्तान आपल्या सार्वभौमत्वासाठी शेवटच्या थेंबापर्यंत लढेल.”
भारताने सिंधू पाणी करारावर पुनर्विचार करण्याच्या सूचनांवर प्रतिक्रिया देताना शाहबाज शरीफ यांनी चेतावणी दिली. त्यांनी ठामपणे सांगितले की, “जर पाणी थांबवण्याचा प्रयत्न केला गेला तर आम्ही पूर्ण ताकदीने उत्तर देऊ.” सिंधू करार हा पाकिस्तानसाठी जीवनवाहिनी आहे, असे ते म्हणाले. त्यांनी भारताला आवाहन केले की, शांततेच्या मार्गावर राहावे, अन्यथा पाकिस्तानला आपल्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलावी लागतील.
दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामुळे भारतात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भारतीय नेत्यांनी पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. भारताने जाहीर केले आहे की, या हल्ल्याचा बदला घेतला जाईल आणि त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे. भारताने पाकिस्तानवर दहशतवादाला पाठिंबा देण्याचा ठपका ठेवत, जागतिक व्यासपीठावरही या मुद्द्याला जोरदार उचलून धरले आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान संबंधांत तणावाची नवी लाट निर्माण झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मोठी बातमी! बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्करावर BLA चा हल्ला; १० सैनिक ठार
शाहबाज शरीफ यांचे कठोर वक्तव्य आणि भारताच्या तीव्र प्रतिक्रियेमुळे दक्षिण आशियात पुन्हा एकदा संघर्षाचे ढग घोंगावत आहेत. शांततेच्या दिशेने वाटचाल होण्याऐवजी, दोन्ही बाजूंनी चकमकीच्या शक्यता वाढविल्या आहेत. पुढील काळात या वादाला कोणते वळण मिळते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.