(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोन्याच्या मागणीतील घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे सोन्याच्या सतत वाढलेल्या किमती. सोन्याच्या वाढलेल्या किमतींमुळे अनेक लोकांनी दागिने खरेदी करण्याचं आपलं प्लॅनिंग पुढे ढकललं आहे. काहींनी तर रद्दच केलं आहे. ज्यांनी खरेदी केली, त्यांनी जड दागिन्यांऐवजी हलक्या वजनाच्या दागिन्यांना पसंती दिली. पण पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत भारतातील मागणी १४ टक्क्यांनी वाढली असली तरी, वार्षिक तुलनेत त्यात घट झाली आहे.
२०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत, भारतातील सोन्याच्या दागिन्यांची एकूण मागणी १४१ टन होती, जी मागील वर्षाच्या तुलनेत १७% नी कमी झाली होती. पण सोन्याच्या वाढलेल्या किमतींमुळे, या मागणीचे एकूण मूल्य २६% पेक्षा जास्त वाढून २१ अब्ज डॉलर्सवर पोहोचले. याचा अर्थ लोकांनी कमी सोनं खरेदी केलं, पण जास्त पैसे दिले गेले. याचा अर्थ सोन्याचे भाव बरेच वाढलेत.
एप्रिल-जून या तीन महिन्यांत सोन्याची जागतिक मागणी अंदाजे १,२६९ टन इतकी होती. जी गेल्या वर्षीच्या मागणी इतकीच बरोबरीची आहे. गोल्ड ईटीएफ, गोल्ड बार आणि नाण्यांमधील गुंतवणूक २६२ टनांपर्यंत कमी झाली. पहिल्या सहा महिन्यांत सोन्याच्या विटा आणि नाण्यांमधील गुंतवणूक गेल्या वर्षीच्या तुलनेत २१% जास्त होती.
असेही वृत्त आहे की, मध्यवर्ती बँका सातत्याने सोन्याची खरेदी करत आहेत. एप्रिल-जून या तीन महिन्यांत, जगभरातील मध्यवर्ती बँकांनी त्यांच्या साठ्यात २८९ टन सोन्याची भर घातली, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत ६२% जास्त आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही याच कालावधीत २०० किलो सोन्याची खरेदी केली.
WGC च्या मते, पुढील सहा महिन्यांत गुंतवणुकीच्या उद्देशाने सोन्याची मागणी वाढली आहे. जर सोन्याचे भाव जास्त राहिले, तर दागिन्यांच्या खरेदीवर दबाव येईल. त्यामुळे, लोक लहान किंवा हलके दागिने खरेदी करणे हा एक चांगला पर्याय मानू शकतात.






